१० जुलैला चातुर्मासारंभ: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा; धनलाभाचे योग, समृद्धी वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:12 AM2022-07-07T10:12:13+5:302022-07-07T10:16:38+5:30

Chaturmas 2022: चातुर्मासानंतर काही राशीच्या व्यक्तींना करिअर, नोकरी, मिळकतीत फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

मराठी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांना धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीयदृष्ट्याही फार महत्त्व आहे. मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. (Chaturmas 2022 Astrology)

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपर्यंतचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या कालावधीत अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात.

या चातुर्मास कालावधीत श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने येतात. यंदा सन २०२२ मध्ये रविवार, १० जुलैपासून चातुर्मास सुरू होत असून, शुक्रवार, ०४ नोव्हेंबर रोजी चातुर्मासाची सांगता होणार आहे.

चातुर्मासात अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ म्हटले आहे; कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी समजूत असल्याची मान्यता आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. या काळात शुभ, मंगलकार्य केली जात नाही.

ज्योतिषशास्त्रातही या चातुर्मासाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. बारापैकी या ५ राशींना चातुर्मासात विशेष लाभ होऊ शकतील. या काळात करिअरमध्ये यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. धन-समृद्धी वाढू शकेल. कुटुंबात सुख-समृद्धी येऊ शकेल. जाणून घेऊया...

चातुर्मासात मेष राशीच्या व्यक्तींवर भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद असू शकेल. विष्णूंच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळू शकेल. नशिबाची साथ मिळेल. करिअरसाठी हा काळ अधिक खास असेल. या दरम्यान तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. दररोज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुपाचा दिवा लावावा, असे सांगितले जात आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी चातुर्मासाचा काळ व्यापारासाठी अनुकूल राहू शकेल. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू लागू शकेल. मात्र, तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करण्यास आताचा कालावधी अनुकूल नाही. यावर उपाय म्हणून चातुर्मासात दर गुरुवारी विष्णूला सहस्रनाम पठण करावे आणि तुळशीला दिवा अर्पण करावा, असे सांगितले जात आहे.

बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीच्या लोकांसाठी चातुर्मासाचा काळ सर्वच बाबतीत चांगला राहील. यावेळी, तुम्हाला करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नंतरचा काळ व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगले परिणाम देईल. या काळात तुम्ही मुलांबाबतही समाधानी असाल आणि त्यांच्याशी संबंधित प्रगतीही तुम्हाला आनंद देईल. यावर उपाय म्हणून शक्य असल्यास चातुर्मासात गाईला अन्नदान करावे.

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चातुर्मासाचा काळ काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत प्रतिकूल ठरू शकतो. मित्रांसोबत विनाकारण वाद होऊ शकतात. मात्र, व्यवसायात नफा झाल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबातील जुन्या गोष्टींबाबत वाद टाळा. यावेळी व्यवसायात जास्त पैसे गुंतवू नका, जे आहे ते पुढे करा. यावर उपाय म्हणून प्रत्येक गुरुवारी पिठात हळद, हरभरा डाळ आणि गूळ मिसळून गायीला खायला द्यावे.

वृश्चिक राशीच्या लोकांवर चातुर्मासात भगवान श्रीनारायणाची कृपा राहील. पगारदार लोकांना यावेळी नोकरीच्या ठिकाणी त्यांचे आवडते काम करायला मिळेल, तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. यावेळी तुमची आवड अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात अधिक असेल. यावर उपाय म्हणून दर मंगळवारी गुळाचे दान करावे.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार चातुर्मास काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते, अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात, असा समज आहे.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित बाबींसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.