ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुकची व्हॅलिडीटी पाहिली का? असे रिन्यू करा नाहीतर ५००० चा दंड भरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:12 PM2020-12-22T16:12:42+5:302020-12-22T16:19:43+5:30

driving license, RC book renewal: कोरोनामुळे ज्या लोकांचे लायसन किंवा आरसी बुकची वैधता, फिटनेस प्रमाणपत्र मार्च २०२० नंतर संपत असेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश होते. आता ही मुदत संपत आली आहे.

जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन किंवा वाहनाच्या आरसी बुकची वैधता संपली किंवा संपत आली असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नवीन वर्षापासून तब्बल ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने रिन्यू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची सूट दिली होती.

ज्या लोकांचे लायसन किंवा आरसी बुकची वैधता, फिटनेस प्रमाणपत्र मार्च २०२० नंतर संपत असेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश होते. आता ही मुदत संपत आली आहे.

यामुळे वाहनचालकांना त्यांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नुतनीकरण करावे लागणार आहे. परिवाहन विभागाद्वारे दिली गेलेली सूट ३१ डिसेंबरला संपत आहे.

आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर केंद्रीय रस्ते परिवाहन आणि राजमार्ग मंत्रालयाने ही सूट दिलेली मुदत वाढविली नाही तर वाहन चालकांच्या अडचणी वाढणार आहेत.

नवीन मोटर वाहन नियमांनुसार जर वाहनचालकाकडे लायसन किंवा वाहन परवाना नसेल आणि जर त्याला वाहन चालविताना पकडले तर ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करण्यासाठी परिवाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. parivahan.gov.in वर "ड्रायव्हिंग लायसन-संबंधित सेवा" वर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर अर्जदाराला "डीएल सेवा" वर क्लिक करावे लागेल. यामध्ये लायसन नंबरसह अन्य माहिती भरावी लागणार आहे. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

जवळच्या आरटीओ कार्यालयात अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.

आरटीओमध्ये गेल्यावर बायोमेट्रिकद्वारे कागदपत्रे तपासली जाणार आहेत. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन दिले जाणार आहे.

हीच प्रक्रिया वाहनाच्या आरसी नुतनीकरणाची देखील आहे. मात्र, यासाठी तुम्हाला पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे लागणार आहेत.

या दोन्ही प्रक्रियेसाठी या महिन्यात मोठी गर्दी झाली आहे, यामुळे वेटिंग पिरिएडही वाढला आहे. असे झाल्यास तुम्ही वाहन चालविणे बेकायदेशीर आणि धोक्याचे ठरणार आहे. अपघात झाल्यास वाहनाच्या आरसीसह लायसनही नसल्याने मनुष्यवधासारखे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.