FASTag Update: कारचा अपघात झाल्यास FASTag तसाच ठेवता का? मोठे नुकसान होऊ शकते, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 10:25 AM2021-11-17T10:25:33+5:302021-11-17T10:30:03+5:30

Is FASTag Remove After Car Accident: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अपघातग्रस्त कारचा फास्टॅग काढला नाही तर कार मालकाला मोठे नुकसान होऊ शकते.

FASTag Update: भारतात रस्ते अपघात नेहमीचे झाले आहेत. रस्त्याने जाताना कुठे ना कुठे वाहनांचा अपघात झालेला दिसतो. अपघात झाल्यानंतर जर गंभीर दुखापत झाली नसल्यास आपण पहिले कम करतो ते म्हणजे आपले साहित्य ताब्यात घेणे. कारण त्याची चोरी होऊ शकते. परंतू आता आणखी एक काम करावे लागणार आहे.

कारचा अपघात झाल्यावर तुम्ही कधीच फास्टॅग काढून ताब्यात घेतला नसेल. तसे कोणी करतही नाही. देशात गेल्या 4 वर्षांपासून फास्टॅग वापरला जातो. गेल्या वर्षीपासून तो अत्यावश्यक करण्यात आला आहे. यामुळे आता बहुंतांश गाड्यांवर फास्टॅग आहे. हा फास्टॅग अपघात झाल्यावर काढणे बंधनकारक आहे.

अपघातग्रस्त कारचा फास्टॅग काढला नाही तर कार मालकाला मोठे नुकसान होऊ शकते. FASTag ही महामार्गांवरील इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली आहे. यामध्ये एक चीप असते, जी एका खात्याला जोडलेली असते. जेव्हा जेव्हा तुमचे वाहन टोल प्लाझावरून जाते तेव्हा ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून कापली जाते.

ही रक्कम तुमच्या फास्टॅगच्या खात्यात आधीपासूनच ठेवावी लागते. ही रक्कम अपघातानंतर न काढल्यास ती फुकट जाऊ शकते. काही कंपन्या खूप ग्राहक फ्रेंडली असल्याने याचा प्रश्न येत नाही. कारण तुमचे इतर कामांसाठी वापरले जाणारे वॉलेट आणि फास्टॅगशी जोडलेले वॉलेट एकच असते. यामुळे तुम्ही ही रक्कम इतर कामासाठी वापरू शकता.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर फास्टॅग हटविण्यासाठी दोन मुख्य कारणे आहेत. अपघातात समोरील काच फुटली तर आणि उर्वरित रक्कम अडकेल तर.

अपघातानंतर कार फुटल्यास किंवा तडे गेल्यास फास्टॅगवर तुमच्या कारची, तुमची माहिती असलेली एक चिप असते ती खराब होऊ शकते. फास्टॅग सुस्थितीत दिसत असेल परंतू ही चिप खराब झाली तर तुम्हाला विना फास्टॅग समजले जाईल आणि दंड भरावा लागू शकतो.

जर तुमचा फास्टॅग खराब झाला तर तुम्हाला दुसरा फास्टॅग खरेदी करावा लागेल. यामुळे जुन्या फास्टॅगमधील रक्कम तुम्हाला दुसऱ्या फास्टॅगमध्ये ट्रान्सफर करावी लागेल. हे फास्टॅग नंबरने शक्य होते. यामुळे तुम्हाला जुना फास्टॅग काढून घ्यावा लागणार आहे.

देशात फास्टॅग प्रणाली बसविण्याचे उद्देश वाहन चालकांचा टोलवरील वेळ वाचविणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि पर्यायाने इंधन वाचविणे हा होता. परंतू यापैकी काहीही साध्य होताना दिसत नाहीत. उलट फास्टॅग स्कॅन झाला नाही किंवा पुढे फुकट्यांचे म्हणजेच 'आय डी' कार्ड दाखविणाऱ्यांचे वाहन असले तर टोल प्लाझावर रांगा लागतच आहेत. मागच्यांना विनाकारण थांबावे लागते.

यामुळे मूळ उद्देश बाजुला राहत असून फास्टॅगचा भूर्दंड मात्र वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. रक्कम असूनही फास्टॅग स्कॅन झाला नाही तर दुप्पट टोल वसूल केला जात आहे.