विनयभंग, मारहाण प्रकरणी आरोपींची शिक्षा कायम; जिल्हा सत्र न्यायालयाने अपील फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 19:17 IST2026-05-11T19:16:56+5:302026-05-11T19:17:21+5:30
फिर्यादीने १२ मार्च २०१८ रोजी घडलेल्या विनयभंग व मारहाण प्रकरणात परभणी ग्रामीण ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

विनयभंग, मारहाण प्रकरणी आरोपींची शिक्षा कायम; जिल्हा सत्र न्यायालयाने अपील फेटाळले
राजन मंगरुळकर
परभणी : विनयभंग व मारहाण प्रकरणातील तीन आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २ सप्टेंबर २०२१ ला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन.आर.नाईकवाडे यांनी आठ मे रोजी दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीचे अपिल फेटाळून शिक्षा कायम ठेवली आहे. यात एका आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी तर अन्य दोघांना दोषी ठरवून चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर समज दिली.
फिर्यादीने १२ मार्च २०१८ रोजी घडलेल्या विनयभंग व मारहाण प्रकरणात परभणी ग्रामीण ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. तपास हवालदार वाय.एम. खान यांनी केला. घटनास्थळ पंचनामा, साक्षीदाराचे जवाब घेऊन कल्याण शेषेराव लांडे, शेषेराव आश्रोबा लांडे, अर्जुन शेषेराव लांडे (रा.भोगाव साबळे, ता. परभणी) याच्याविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दोन सप्टेंबर २०२१ ला आरोपींना दोषी ठरवून कल्याण शेषराव लांडे यास कलम ३५४ अ भादवी अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली होती. शेषेराव आश्रोबा लांडे आणि अर्जुन शेषराव लांडे या दोघांना कलम ३२३ भादवी अन्वये दोषी ठरवून चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर समज दिली व प्रत्येकी ५०० रुपये नुकसान भरपाई म्हणून साक्षीदार क्रमांक दोन यांना देण्यात यावे, अशी शिक्षा दिली होती.
आरोपींनी सन २०२१ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे अपील दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश- १ एन.आर.नाईकवाडे यांच्यासमोर युक्तीवाद चालला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर आठ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश- १ एन.आर.नाईकवाडे यांनी आरोपीची अपिल फेटाळून शिक्षा कायम ठेवली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनात आनंद गिराम यांनी बाजू मांडली. पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, वैशाली बिंडे, वंदना आदोडे, धबडगे यांनी काम पाहिले.