Parbhani: जालन्याचा 'बाबुशा' निघाला वालूरचा खुनी दरोडेखोर; खुनाचा अडीच महिन्यांनी छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:42 IST2026-01-17T12:40:32+5:302026-01-17T12:42:09+5:30
झरी ते वालूर; खुनी टोळीचा असा लागला छडा, दोन साथीदारांचा शोध सुरू

Parbhani: जालन्याचा 'बाबुशा' निघाला वालूरचा खुनी दरोडेखोर; खुनाचा अडीच महिन्यांनी छडा
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी): दिवाळीच्या धामधुमीत सेलू तालुक्यातील वालूर येथे एका तरुणाचा खून करून वृद्ध दांपत्याला लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबुराव उर्फ बाबुशा सावळा पवार (वय ६०, रा. जालना) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने आपल्या दोन साथीदारांसह वालूरसह झरी आणि पार्डी येथील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
दिवाळीतील तो काळा दिवस
२२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वालूर येथील श्रीकृष्ण मंदिरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला होता. तेथे दत्तराव भोकरे आणि सुरूबाई भोकरे या वृद्ध दांपत्याला बेदम मारहाण करून त्यांच्या कानातील दागिने हिसकावले. यानंतर शेजारच्या शेत आखाड्यावर झोपलेला तरुण संतोष सोनवणे याच्यावर लोखंडी गजाने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केली. आजी वच्छलाबाई यांनाही मारहाण करून दागिने लुटून दरोडेखोर फरार झाले होते. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले होते.
तपासाचा केंद्रबिंदू: 'मोडस ऑपरेंडी'
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विवेकानंद पाटील यांनी झरी येथील ९ ऑक्टोबरच्या घटनेचा अभ्यास केला. झरी आणि वालूर या दोन्ही ठिकाणी दरोडेखोरांची अंगकाठी आणि गुन्हा करण्याची पद्धत सारखीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हाच धागा पकडून पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले. १५ जानेवारी रोजी सापळा रचून बाबुराव पवारला ताब्यात घेतले असता त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
नियोजनबद्ध कट
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, वालूरमध्ये चोरी करण्यापूर्वी त्यांनी दुपारी त्याच मंदिरात चहा पिला होता. तिथेच रात्रीचा 'प्लॅन' ठरला. खून आणि दरोड्यानंतर त्यांनी पार्डी येथून एक दुचाकी चोरून पळ काढला होता. सध्या आरोपी २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असून, त्याचे इतर दोन साथीदार आणि चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी सेलू पोलीस अधिक तपास करत आहेत.
यांनी केली कारवाई
या तपास मोहीमेत स्थागुशाचे पो.नि.विवेकानंद पाटील, सपोनी श्रीधर जगताप, चंदनसिंह परिहार,पो. नि. दिपक बोरसे (सेलू),पो. ह. मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ, विलास सातपुते, केशव लटपटे, रणजीत आगळे, रंगनाथ दुधाटे,मुकेश बुधवंत,पांडुरंग तुपसमिद्रे, गजानन क्षिरसागर, मधुकर ढवळे,उमेश चव्हाण, परसराम गायकवाड, उत्तम हानवटे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांचा सामावेश होता.