कोरोनामुळे वाढला चिंतारोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:12+5:302021-05-09T04:18:12+5:30
परभणी : कोरोनाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्ह्यात चिंतारोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची नोंद तज्ज्ञांनी घेतली आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून ...
परभणी : कोरोनाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्ह्यात चिंतारोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची नोंद तज्ज्ञांनी घेतली आहे.
गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आहे. विशेषतः पूर्वीपासून काळजी करणाऱ्या, घाबरणाऱ्या नागरिकांच्या चिंता कोरोना काळात अधिकच वाढल्या आहेत. एखाद्या रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास तो माझ्यापेक्षा लहान होता तरीही त्याचा मृत्यू झाला, त्यातूनच मलाही कोरोना झाला तर, अशी चिंता करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग कधी कमी होणार, तो कमीच होणार नाही का? कोरोनाची तिसरी लाट येत आहे, या सर्व बाबींच्या येणाऱ्या माहितीतून चिंता करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथील मनोरुग्ण तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेमध्ये त्यांनीही अशाप्रकारचे रुग्ण वाढले असल्याची माहिती दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतरही काहीजणांना मानसिक ताण येत आहे. त्यामध्ये मला ऑक्सिजनशिवाय जमणारच नाही. नेहमी धडधड झाल्यासारखं वाटतंय, अशी लक्षणेही असणारे रुग्ण उपचारासाठी येत आहे. चिंतारोगाबरोबरच पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस दिसोर्डर (पीटीएसडी) या आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. कोरोनातून अथवा एखाद्या आजारातून बरे झाल्यानंतर पुन्हा-पुन्हा त्या आजाराच्या आठवणी जागवून घाबरणे, अशी लक्षणे या आजारात दिसून येतात. याबरोबरच आर्थिक परिस्थितीतून निर्माण झालेला तणाव आणि आणि चिंतेतून डिप्रेशन येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनापूर्वीचा काळ आणि कोरोना संसर्ग काळ यात चिंतारोग जडलेल्या रुग्णांची संख्या निश्चितच वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.