शेतीचा वाद अन् अनैतिक संबंधाच्या रागातून महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:16 AM2021-04-16T04:16:46+5:302021-04-16T04:16:46+5:30
देवगाव फाटा : शेतीचा वाद आणि एका व्यक्तीसमवेत असलेल्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून तळतुंबा येथील महिलेचा खून केल्याची ...
देवगाव फाटा : शेतीचा वाद आणि एका व्यक्तीसमवेत असलेल्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून तळतुंबा येथील महिलेचा खून केल्याची फिर्याद मयत महिलेच्या भावाने १५ एप्रिल रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिली असून, त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सेलू तालुक्यातील तळतुंबा येथे १४ एप्रिल रोजी आशामती परसराम घुले या ४२ वर्षीय महिलेच्या डोक्यात वीट मारून दिरानेच तिचा खून केल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी मारोती तिरंदाज घुले हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता; मात्र या प्रकरणात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने महिलेच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आशामती घुले यांचे भाऊ सुधाकर पुंजाजी दौंड यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर खुनाचा उलगडा झाला.
आशामती घुले या तळतुंबा येथे एकट्याच स्वतंत्र खोलीत राहत होत्या. त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि शेतीचा वाद, त्याचप्रमाणे गणेश घुले यांच्या सोबत असलेले अनैतिक संबंध याचा राग मनात धरून आरोपी मारुती तिरंदाज घुले याने खून केल्याची फिर्याद सुधाकर दौड यांनी दिली आहे. त्यावरून आरोपी मारुती घुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी मारुती घुले यास अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक गोवर्धन घुमे तपास करीत आहेत. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल आणि पोलीस निरीक्षक भुमे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
एकटीच राहत होती महिला
मयत आशामती परसराम घुले या तळतुंबा येथे वाड्यात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती परसराम घुले हे पंधरा वर्षांपासून बेपत्ता आहेत. तर त्यांच्या एका मुलाने सहा महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहितीही पोलिसांकडून मिळाली.