यादव, शमी, अँरोन विश्‍वचषकात निर्णायक ठरतील

By Admin | Updated: September 9, 2014 03:11 IST2014-09-09T03:11:40+5:302014-09-09T03:11:40+5:30

शोएब म्हणाला,'उमेश, शमी आणि अँरोन हे महत्त्वाचे गोलंदाज आहेत. या तिघांना ताजेतवाने ठेवा. विश्‍वचषकात हे गोलंदाज सामने जिंकून देऊ शकतील.

Yadav, Shami and the Enron World Cup will be the decisive factor | यादव, शमी, अँरोन विश्‍वचषकात निर्णायक ठरतील

यादव, शमी, अँरोन विश्‍वचषकात निर्णायक ठरतील

बर्मिंघम : २0१५ च्या विश्‍वचषकात भारताला जेतेपद राखायचे झाल्यास वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि वरुण अँरोन यांच्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असा सल्ला पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने कडवा प्रतिस्पर्धी भारताला दिला आहे.
शोएब म्हणाला,'उमेश, शमी आणि अँरोन हे महत्त्वाचे गोलंदाज आहेत. या तिघांना ताजेतवाने ठेवा. विश्‍वचषकात हे गोलंदाज सामने जिंकून देऊ शकतील. त्यांच्याकडून योग्य सराव करून घ्यावा आणि चांगले प्रशिक्षण द्यायला हवे. हे तिघेही तंदुरुस्त राहिले व आक्रमक कामगिरीत भक्कम ठरले तर विश्‍वचषकात भारताला रोखणे कठीण जाईल.'
शोएब सध्या प्रथम श्रेणी मोसमात स्टेट बँक ऑफ पाकिस्तान संघाचा कोच आहे. शमी आणि भुवनेश्‍वर यांच्याकडून गेल्या वर्षभरात अनेक सामन्यात गोलंदाजी करुन घेण्यात आली. यावर शोएब म्हणाला,'आता या खेळाडूंना विश्रांती द्या. विश्‍वषकासाठी मुख्य गोलंदाजांना विश्रांती मिळाली तर ते विश्‍वचषकात चमकदार कामगिरी बजावतील. खेळाडू रोटेट होत राहिल्यास तंदुरुस्ती कायम राहील आणि थकवा अथवा जखम यांची समस्या जाणवणार नाही. भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियात मोठय़ा दौर्‍यात असतील ते थकून जातील. त्यांना सामने न खेळविता सराव द्या आणि हळूहळू फिटनेस सुधारण्यावर भर द्यावा.'
भारतीय गोलंदाजीवर चिंता व्यक्त करीत शोएब पुढे म्हणाला,'गोलंदाजीत सकारात्मक सुधारण्यास वाव आहे. अखेरच्या षटकांत कसे चेंडू टाकायचे याचे तंत्र अवगत करायला हवे. '
भारत विंडीजविरुद्ध भारतात मालिका खेळेल आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. पाच महिन्यांच्या या दौर्‍यात चार कसोटी, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिका व त्यानंतर ऑस्ट्रेलिया- न्यूझिलंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्‍वचषकात खेळणार आहे. 
शोएब म्हणाला,'भारतीय गोलंदाजांनी केवळ स्वत:चा वेग सुधारावा. चेंडू स्विंग करण्याकडे सध्या लक्ष देऊ नये. चेंडू स्विंग करण्याची त्यांच्यात क्षमता आहे पण चेंडू वेगवान येणार असेल आणि तो स्विंग झाला तर अधिक भेदक ठरतो.' 
३९ वर्षांचा शोएब 'रावळपिंडी एस्क्प्रेस या नावाने ओळखला जातो. तो म्हणतो,'भारताच्या वेगवान गोलंदाजांना चेंडूत आणखी वेग आणायचा झाल्यास फिटनेस लेव्हल वाढवावी लागेल. तंत्र देखील विकसित करावे लागेल. भारतीय गोलंदाज अधिक क्रिकेट खेळत असल्याने थकतात. थकवा घालवून किमान सामने खेळल्यास गडी बाद करण्याचे कौशल्य वेगवान गोलंदाजांमध्ये येईल, असा मला विश्‍वास वाटतो.'(वृत्तसंस्था)

 

Web Title: Yadav, Shami and the Enron World Cup will be the decisive factor