नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार?; सर्व नगरसेवकांचा भाजपामध्ये जाण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:44 PM2019-07-29T17:44:12+5:302019-07-29T17:45:19+5:30

महापौर बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक; नगरसेवक गणेश नाईकांची घेणार भेट

all ncp corporators in navi mumbai likely to join bjp | नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार?; सर्व नगरसेवकांचा भाजपामध्ये जाण्याचा निर्णय

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार?; सर्व नगरसेवकांचा भाजपामध्ये जाण्याचा निर्णय

googlenewsNext

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये सर्वांनी प्रवाहाबरोबर जाण्याची भूमिका मांडली आहे. पक्षाचे नेते गणेश नाईक यांना भेटून हा निर्णय कळवला जाणार असून लवकरच नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सीबीडी बेलापूरमधील पारसिक हिलवर असलेल्या महापौर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपासून गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरण्यास सुरुवात केली होती. दोन दिवसांपासून नाईकांच्या पक्षांतराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे महापौर बंगल्यावरील बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी एकही नगरसेवक पक्षांतर करणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्ष बैठकीमध्ये सर्वच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची आग्रही भूमिका मांडली. 

शहराच्या विकासासाठी प्रवाहाबरोबर जाणे आवश्यक असल्याचा सूर सर्व नगरसेवकांनी आळवला. शहराचा विकास करताना महापालिका अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असते. पण यामधील काही निर्णयांना राज्य शासनाकडून मंजुरी मिळत नाही. काही निर्णय वेळेत होत नाहीत. यामुळे शहराचा विकास अपेक्षित गतीने होत नाही. शहराचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली आहे. 

बैठकीपूर्वी कोणीही पक्षांतर करणार नाही, असे सांगणारे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी बैठकीनंतर नगरसेवकांनी पक्षांतराची भूमिका मांडली असल्याचे मान्य केले. सर्वांनीच एकमुखाने प्रवाहाबरोबर जाण्याची मागणी केली असून या भावना गणेश नाईक यांच्यापर्यंत पोहोचवणार असून त्यांच्याकडे पक्षांतरासाठी आग्रह केला जाणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. या प्रकरणी अंतिम निर्णय त्यांचाच असेल असेदेखील सुतार यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापौर बंगल्यावर आयोजित बैठकीमध्ये सर्वच नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी प्रवाहाबरोबर जाण्याची भूमिका मांडली आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करताना राज्य शासनाचे सहकार्य असणे आवश्यक असते. विकासाला गती मिळावी यासाठी भाजपामध्ये जाण्याची भूमिका मांडली आहे. या भावना पक्षाचे नेते गणेश नाईक यांना कळवणार असून त्यांनाही प्रवाहाबरोबर जाण्यासाठी आग्रह धरणार असून ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. 
- अनंत सुतार,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस  

50 नगरसेवकांची उपस्थिती
महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 नगरसेवक असून पाच अपक्ष नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला असून त्यांचे संख्याबळ 57 आहे. यापैकी जवळपास 50 नगरसेवक व महत्त्वाचे पदाधिकारी महापौर बंगल्यावरील स्नेहभोजनाला उपस्थित होते. ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या आईचे निधन झाल्यामुळे व माजी महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अशोक गावडे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित नव्हते. 
 

Web Title: all ncp corporators in navi mumbai likely to join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.