सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने केली आत्महत्या,'अग्निपथ' योजनेमुळे होता नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:06 IST2022-06-17T16:04:51+5:302022-06-17T16:06:28+5:30
Suicide Case :भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे.

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने केली आत्महत्या,'अग्निपथ' योजनेमुळे होता नाराज
भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अग्निपथ योजनेमुळेच त्याने आत्महत्या केल्याचे मित्र आणि कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लष्करात भरतीसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे.
बालासोर जिल्ह्यातील सोरोच्या तेंतई गावात राहणारा धनंजय मोहंती हा तरुण सैन्यात भरती होण्यासाठी मेहनत घेत होता. बुधवारी रात्री उशिरा त्याने छताला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. मीडियाशी बोलताना धनंजयचा मित्र पिताबस राज म्हणाला की, तो माझा चांगला मित्र होता. आम्ही गेल्या चार वर्षांपासून सैन्यात भरती होण्याची तयारी करत होतो. माझा मित्र धनंजय दीड वर्षापूर्वी फिजिकल फिटनेस टेस्ट पास झाला. त्यांना लष्कराकडून लेखी परीक्षेचे आश्वासन मिळाले होते. कोरोनाच्या काळात लेखी परीक्षा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर अग्निपथ योजनेमुळे ती रद्द करण्यात आली.
या निदर्शनाची बातमी Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून मिळाली
मित्राने सांगितले की, Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून त्याला कळले की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकाता येथील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. हा सर्व प्रकार पाहून धनंजयचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने काल रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मला मेसेज केला होता. या सरकारवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कधीही मत देऊ नका, असे मित्र पिताबस म्हणाला. अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर लष्कराने लेखी परीक्षा रद्द केली, त्यामुळे मुलाने असे पाऊल उचलले, असा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. धनंजयच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबावर शोककळा पसरली.
धनंजयच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याचे अवयव दान करायचे होते. मात्र, सोरो रुग्णालयात अवयवदानाची सुविधा नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना ते करता आले नाही.
शुक्रवारी देशाच्या अनेक भागात निदर्शने झाली
इंडिया टुडेशी बोलताना बालासोर पोलिसांचे एसपी सुधांशू मिश्रा म्हणाले की, मला सोरोच्या घटनेची माहिती नाही, मृत्यूचे नेमके कारण तपासावे लागेल. चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्याच्या मोदी सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने सुरूच होती. दरम्यान, विविध राज्यांतील तरुणांच्या हिंसक निदर्शनांदरम्यान केंद्राने गुरुवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीची सर्वाधिक वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे केली.