लखनौ/मुंबई :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक'मध्ये आपली तुलना हिटलरशी करण्यात आल्यानंतर योगी यांनी हा पलटवार केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर ते उत्तर प्रदेशात परत आले नसते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या मुद्द्यावर एका पाठोपाठ एक, अनेक ट्विट करण्यात आले आहेत. एका ट्वीटमध्ये संजय राऊतांना टॅग करत म्हणण्यात आले आहे, की 'एक भूकेले मूलच आपल्या आईला शोधते. जर महाराष्ट्र सरकारने 'सावत्र आई' होऊनही आश्रय दिला असता, तर महाराष्ट्राला बळकट करणाऱ्या आमच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांना पुन्हा उत्तर प्रदेशात येण्याची गरज भासली नसती.'
CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"
'शिवसेना सरकारकडून केवळ छळच मिळाला' -आणखी एका ट्वीटमध्ये, योगींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यात म्हणण्यात आले आहे, 'आपल्या रक्ताने आणि घामाने महाराष्ट्राला उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-काँग्रेस सरकारकडून केवळ छळच मिळाला. लॉकडाउनमध्ये त्यांना धोका दिला गेला. त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आणि घरी जाण्यास प्रवृत्त केले. या अमानवीय कृत्यासाठी मानवता उद्धव ठाकरेंना कधीही क्षमा करणार नही.'
'काळजीचं नाटक करू नका' -आणखी एका ट्विटमध्ये योगींच्या कार्यालयाने लिहिले आहे, 'अपल्या घरी पोहोचत असलेल्या सर्व बहिण भावांची राज्यात काळजी घेतली जाईल. आपली कर्मभूमी सेडण्यासाठी भाग पाडल्यानंतर त्यांच्या काळजीचे नाटक करू नका. सर्व मजूर बंधूंना खात्री आहे, की आता त्यांची जन्मभूमी त्यांची कायमच काळजी घेईल. शिवसेना आणि काँग्रेसनेही खात्री ठेवावी.'