"अफवांवर विश्वास ठेवू नका; LPG च्या उत्पादनात मोठी वाढ"; गॅस सिलिंडरच्या टंचाईवर सरकारचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:25 IST2026-03-12T17:06:35+5:302026-03-12T17:25:14+5:30
ऊर्जा संकटावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली

"अफवांवर विश्वास ठेवू नका; LPG च्या उत्पादनात मोठी वाढ"; गॅस सिलिंडरच्या टंचाईवर सरकारचं स्पष्टीकरण
Petroleum Minister Hardeep Singh Puri: ऊर्जा संकटावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकसभेत बोलताना "जगाच्या ऊर्जा इतिहासामध्ये असे संकट कधीच आले नव्हते, मात्र पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दी धोरणांमुळे भारताची इंधन सुरक्षा पूर्णपणे सुरक्षित आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या अफवांना पूर्णविराम देताना मंत्री पुरी म्हणाले की, गेल्या पाच दिवसांत रिफायनरी निर्देशांद्वारे एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. देशातील ३३ कोटी कुटुंबांच्या, विशेषतः गरीब कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसचा तुटवडा भासणार नाही, ही सरकारची प्राथमिकता आहे.
"गेल्या पाच दिवसांत, एलपीजी उत्पादनात २८ टक्के वाढ झाली आहे आणि प्रत्यक्षात पुढील खरेदी सुरू आहे. मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता ही भारतातील ३३ कोटी कुटुंबांच्या, विशेषतः गरीब आणि वंचितांच्या स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये ही आहे. देशांतर्गत पुरवठा पूर्णपणे संरक्षित आहे. देशात सीएनजीचा पुरवठा १०० टक्के सुरू आहे. गॅस सिलिंडरबाबत लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ भीतीपोटी मागणी वाढली आहे, मात्र पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे," असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे. तसेच गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत.
होर्मुझ बंद, तरीही पुरवठा सुरूच
इतिहासात पहिल्यांदाच होर्मुझची सामुद्रधुनी व्यावसायिक जहाजांसाठी प्रभावीपणे बंद झाली आहे. पूर्वी भारताचे ४५ टक्के कच्चे तेल याच मार्गावरून येत होते. मात्र, भारताने आता आपला ७० टक्के पुरवठा इतर मार्गावरून वळवला आहे. सध्या भारत २७ ऐवजी ४० देशांकडून कच्च्या तेलाची आयात करत आहे.
नवीन पुरवठादार देशांशी करार
भारताने आपल्या इंधन आयातीचे स्त्रोत विस्तारले आहेत. आता भारत केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलएनजी कार्गो घेत आहे. हे कार्गो दररोज भारतीय बंदरांवर दाखल होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी, उद्योग आणि हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राला एका महिन्यासाठी बायोमास, आरडीएफ पेलेट्स आणि रॉकेल सारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रिफायनरीज् १००% क्षमतेने सुरू
देशातील तेल शुद्धीकरण कारखाने त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. अनेक ठिकाणी ही क्षमता १०० टक्क्यांच्याही वर गेली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एटीएफ किंवा इंधन तेलाचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.