काळाचा घाला! देवदर्शनावरून परतताना राजस्थानमध्ये भीषण अपघात; ४ मित्रांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 10:05 IST2026-02-23T10:04:40+5:302026-02-23T10:05:37+5:30
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर चेचट टोल प्लाझाजवळ एका भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली.

फोटो - आजतक
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे, ज्याने काही क्षणांत चार कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर चेचट टोल प्लाझाजवळ एका भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा आवाज इतका मोठा होता की आसपासचे लोक हादरून गेले आणि काही वेळ कोणालाच काही सुचेनासं झालं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व तरुण कानपूरचे रहिवासी होते. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन ते आपल्या घरी परतत होते. हे चारही मित्र एकत्र धार्मिक यात्रेसाठी निघाले होते. उज्जैनमध्ये बाबा महाकालचे दर्शन घेऊन ते आपल्या शहराकडे परतत होते, मात्र ही त्यांची शेवटची यात्रा ठरेल याची कोणालाही कल्पना नव्हती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.
हा अपघात चेचट टोलजवळ झाला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, कारचा वेग प्रचंड होता आणि ती पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. इंजिनचा भाग आतपर्यंत घुसला होता आणि एअरबॅग्ज असूनही त्यांचा जीव वाचू शकले नाहीत. स्थानिक लोकांच्या मते, एक्स्प्रेसवेवर वाहनांचा वेग सामान्य रस्त्यांच्या तुलनेत खूप जास्त असतो.
अपघात होताच परिसरातून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आपली वाहन् थांबवली. काहींनी पोलिसांना माहिती दिली, तर काही जण मदतीसाठी पुढे सरसावले. चेचट पोलीस ठाण्याचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कारची अवस्था पाहून ही धडक किती भीषण होती याचा अंदाज येत होता. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढणं सोपं नव्हतं. अथक परिश्रमानंतर चारही मृतदेह बाहेर काढण्यात आलं. त्यांना तातडीने मोडक सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.