TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:05 IST2026-05-07T13:04:28+5:302026-05-07T13:05:50+5:30
Vijay Meets Governor: तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच फसला आहे. विजय यांचा टीव्हीके सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमत मात्र मिळालेले नाही. त्यामुळे राज्यपालांकडून हिरवा कंदील दिला गेलेला नाही.

TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
TVK Short of Majority: सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे बहुमत कुठून आणणार, तुम्हाला कोण-कोणत्या पक्षांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे?, असे प्रश्न तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांना विचारले. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर विजय यांनी राज्यपालांची दुसऱ्यांदा भेट घेतली. मात्र, राज्यपालांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने सत्ता स्थापनेला विलंब होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
तामिळनाडू विधानसभेची सदस्य संख्या २३४ आहे. विजय यांच्या पक्षाने निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या. यात विजय हे दोन जागांवरून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी एका जागेचा राजीनामा दिला तर हा आकडा १०७ इतका होईल. तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्यासाठी ११८ बहुमताचा आकडा आहे.
सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांची दोन वेळा भेट
विजय यांनी निकाल लागल्यानंतर दोन वेळा राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र, बहुमताचा आकडा पूर्ण नसल्याने राज्यपालांनी ११८ आमदारांच्या सह्या घेऊन या असे सांगितले आहे. "तुम्ही ११८ आमदारांच्या सह्या घेऊनच या. टीव्हीके पक्षाकडे बहुमत आहे, हे दाखवा आणि त्यानंतरच शपथविधी होऊ शकतो", असे राज्यपालांनी म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थापनेनंतर सरकार स्थिर रहावे, शपथविधीनंतर लगेच कोसळू नये, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.
काँग्रेसचा पाठिंबा तरीही बहुमतापासून दूर
टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. विजय यांनी एका मतदारसंघातून राजीनामा दिला, तर ही संख्या १०७ इतकी होईल. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे पाच आमदार आहेत. त्यामुळे हा आकडा ११२ इतका होईल. तरीही टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अजून ६ आमदारांची गरज आहे.
विजय यांनी सीपीआय (मार्क्सवादी) पक्षालाही पत्र पाठवून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. या पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतरही आणखी चार आमदारांची गरज असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थिर सरकारसाठी काठावरील बहुमत धोक्याचे आहे.
राज्यपालांनी कोणते प्रश्न विचारले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि राज्यपाल यांच्या भेटीत सत्तास्थापनेशी संबंधित काही प्रश्नावर जोर दिला गेला. राज्यपालांनी विचारले की, तुमच्याकडे ११३ आमदार आहेत, इतक्या आमदार संख्येसह सरकार कसे स्थापन केले जाऊ शकते? टीव्हीके सरकारला आणखी कोणते पक्ष पाठिंबा देणार आहेत.
११३ आमदारांसह स्थिर सरकार स्थापन केले जाऊ शकते का? तुम्ही असा दावा कसा करु शकता की सरकार स्थापन केल्यानंतर तुम्ही बहुमत सिद्ध करू करणारच? कोणीतरी पाठिंबा देईल याच विचारावर हे केले जाऊ शकते का? असेही राज्यपालांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.