‘घुसखोरांना मतदार म्हणून समाविष्ट करण्याचा कट होता’, फडणवीस यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:21 IST2026-04-18T06:21:01+5:302026-04-18T06:21:42+5:30
West Bengal Assembly Election 2026: तृणमूल काँग्रेसने घुसखोरांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्याचा कट रचला होता, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प. बंगाल दौऱ्यात केला.

‘घुसखोरांना मतदार म्हणून समाविष्ट करण्याचा कट होता’, फडणवीस यांचा आरोप
कोलकाता - तृणमूल काँग्रेसने घुसखोरांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्याचा कट रचला होता, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प. बंगाल दौऱ्यात केला. एकीकडे तृणमूल काँग्रेस मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला विरोध करत आहे, तर दुसरीकडे ज्यांची नावे कायदेशीर कारणास्तव वगळण्यात आली आहेत त्यापैकी कुणीही विरोध करताना दिसत नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, एसआयआरमध्ये नावे वगळलेल्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी घटनात्मक तरतुदी अस्तित्वात आहेत. ज्यांची नावे कायदेशीर कारणास्तव वगळण्यात आली, त्यांनी विरोध केला नसताना तृणमूल का विरोध करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात बंगाली भाषिक स्थलांतरितांवर हल्ले होत असल्याच्या आरोपांचे फडणवीस यांनी खंडन केले. लोक कामाच्या शोधात पश्चिम बंगाल का सोडून जात आहेत, याची चौकशी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
न्यायालयाने एसआयआर थांबवलेले नाही
सर्वोच्च न्यायालयाने विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत काही भाष्य केले असले तरी हे आरक्षण मात्र थांबवलेले नाही. असे असूनही तृणमूल काँग्रेसला ही संपूर्ण प्रक्रिया थांबवायची होती, असा दावा फडणवीस यांनी केला.
मृत, स्थलांतरित आणि अनधिकृत मतदारांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्यासाठी अशी प्रक्रिया दर १० वर्षांनी राबवली पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुका फसवणुकीच्या मार्गाने जिंकण्याच्या उद्देशाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस या प्रक्रियेला विरोध करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.