Mallikarjun Kharge reaction on Modi speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान राज्यसभेतून काँग्रेसवर जोरदार टीका केला. पीएम मोदींच्या या भाषणावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी UPA सरकारबद्दल असंख्य खोट्या गोष्टी सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, या आरोपांवरुन सरकारसमोर काही मुद्देही मांडले.
मल्लिकार्जुन खरगेंनी मांडले मुद्दे...
सोशल मीडियावर पोस्ट करत मल्लिकार्जुन खरगे म्हणतात, ज्यांचा संविधानावर विश्वास नव्हता, ज्यांनी दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलनात भाग घेतला नाही, तेच आज काँग्रेसला देशभक्तीचे ज्ञान देत आहेत. पंतप्रधानांनी UPA सरकारबद्दल असंख्य खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. यूपीएच्या काळात बेरोजगारीचा दर 2.2 टक्के होता, तो तुमच्या कार्यकाळात 45 वर्षात सर्वाधिक का आहे? यूपीएच्या 10 वर्षात सरासरी विकास दर 8.13% होता, तो तुमच्या काळात फक्त 5.6% का आहे? जागतिक बँकेच्या मते, 2011 मध्येच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता.
यूपीएने डिजिटल इंडियाचा पाया घातलाडिजिटल इंडियाने जो विकास झाला, त्याचा पाया युपीएने आधार आणि डीबीटी बँक खात्याच्या अंतर्गत घातला. आम्ही 2014 पर्यंत 65 कोटी आधार दिले होते. आम्ही 10 वर्षांत 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. डीबीटी-पहलकडून अनुदानाचे काम सुरू झाले होते. स्वाभिमान योजनेंतर्गत आम्ही गरिबांची 33 कोटी बँक खातीही उघडली होती.
सरकारमध्ये 30 लाख पदे रिक्तपीएम मोदी सार्वजनिक उपक्रमांबद्दल काही बोलले होते. आम्ही तुम्हाला आठवण करुन देतो की, तुमच्या 'विका आणि लुटा' धोरणाने एप्रिल 2022 पर्यंत 147 PSU चे पूर्ण/अर्धे/किंवा अंशत: खाजगीकरण केले आहे. सरकारमध्ये 30 लाख पदे रिक्त असून त्यापैकी एससी, एसटी आणि ओबीसींची पदे सर्वाधिक रिक्त आहेत. एकट्या रेल्वे, पोलाद, नागरी विमान वाहतूक, संरक्षण आणि पेट्रोलियम मंत्रालयांमध्ये जवळपास 3 लाख पदे रिक्त आहेत. एकलव्य शाळांमधील 70 टक्के शिक्षक कंत्राटी आहेत.
'तुम्ही फक्त काँग्रेसला शिव्या दिल्या'गेल्या 10 वर्षांत आपली निर्यात आणि आयात यातील तफावत तीन पटीने वाढली आहे आणि ही वस्तुस्थिती माहीत असूनही सरकार ती समस्या म्हणून स्वीकारत नाही आणि सुधारणा करत नाही, हे हृदयद्रावक आहे. मोदीजी, तुमच्या दोन्ही सभागृहातील भाषणांमध्ये तुम्ही काँग्रेसलाच शिव्या दिल्या. 10 वर्षे सत्तेत असूनही स्वत:बद्दल बोलण्याऐवजी फक्त काँग्रेसवर टीका करतात. तुम्ही आजही महागाई, रोजगार, आर्थिक समानता यावर बोलला नाही. प्रत्यक्षात सरकारकडे कोणतीही आकडेवारी नाही. एनडीएचाच अर्थ नो डेटा अव्हेलेबल सरकार असा आहे. अद्याप जनगणना नाही, आर्थिक सर्वेक्षण नाही, रोजगार डेटा नाही, आरोग्य सर्वेक्षण नाही. सरकार सर्व आकडे लपवून खोटे पसरवते. खोटे पसरवणे ही मोदींची गॅरेंटी!, अशी टीका खरगे यांनी या पोस्टमधून केली.