जगाला ज्याची गरज..; राजस्थानात ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा मोठा साठा, चीनच्या मक्तेदारीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 21:11 IST2025-12-01T21:07:22+5:302025-12-01T21:11:45+5:30
Rare Earth Minerals: इलेक्ट्रिक वाहनांपासून एअरोस्पेस, मिसाईल सिस्टीम, अणुऊर्जा, सुपरकंडक्टर, लेसर, चिप मॅन्युफॅक्चरिंग अशा सर्व हाय-टेक उद्योगांसाठी हे खनिज अत्यावश्यक आहेत.

जगाला ज्याची गरज..; राजस्थानात ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा मोठा साठा, चीनच्या मक्तेदारीला धक्का
Rare Earth Minerals: गेल्या काही काळापासून रेअर अर्थ मिनरल्सची जगभरात चर्चा सुरू आहे. चीनमध्ये याचा सर्वाधिक साठा असल्यामुळे, त्यांचा यावर दबदबा आहे. मात्र, आता भारतात रेअर अर्थ मिनरल्सचा मोठा साठा सापडल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या बाडमेर-बालोतरा परिसरात निओबियमसह 15 दुर्मिळ खनिजांचे विशाल भंडार सापडले आहे. यामुळे चीनचा दशकांपासूनचा असलेला दबदबा कमी होणार आहे.
चीनचे वर्चस्व धोक्यात
जगात रेअर अर्थ मिनरल्स म्हटले की, सर्वात आधी चीनचे नाव घेतले जाते. इलेक्ट्रिक वाहनांपासून एअरोस्पेस, मिसाईल सिस्टीम, अणुऊर्जा, सुपरकंडक्टर, लेसर, चिप मॅन्युफॅक्चरिंग अशा सर्व हाय-टेक उद्योगांसाठी हे खनिज अत्यावश्यक आहेत. चीनकडे जगातील सर्वात मोठा साठा असल्याने अमेरिका व पाश्चिमात्य देशसुद्धा व्यापारयुद्धात त्याच्याशी सावध राहतात. मात्र, आता भारतात हे दुर्मिळ खनिज सापडल्याने चीनच्या वर्चस्वाला मोठा धोका बसू शकतो.
100 पट अधिक घनता, भारतासाठी गेमचेंजर
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) नव्या अभ्यासानुसार, बाडमेर-बालोतरा सिवाना रिंग कॉम्प्लेक्समध्ये रेअर अर्थ मिनरल्सची घनता साधारणपेक्षा 100 पट जास्त आहे. याची उत्पादन क्षमता 6,000 मेट्रिक टन असून, संभाव्य मूल्य तब्बल ₹900 अब्ज (90,000 कोटी रुपये पेक्षा जास्त) असल्याचे बोलले जात आहे. तज्ञांच्या मते, हा शोध भारताला रेअर अर्थ क्षेत्रात आत्मनिर्भर करू शकतो आणि जागतिक बाजारात भारत चीनचा सर्वात शक्तिशाली पर्याय बनू शकतो.
कोणते रेअर अर्थ मिनरल्स सापडले?
निओबियम
गॅलियम
रुबिडियम
थोरियम
युरेनियम
सीरियम
टेल्युरियम
लॅंथनाइड समूहातील 15 दुर्मिळ तत्व
या खनिजांचा वापर EV बॅटऱ्या, हाय-टेक मिसाइल व रॉकेट तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, सुपरकंडक्टर्स, अणुऊर्जा, हाय-पॉवर मॅग्नेट, एअरोस्पेस, कर्करोग उपचार औषधे इत्यादींमध्ये वापर होतो. म्हणजेच हा साठा भारताच्या भविष्यातील तंत्रज्ञान-उद्योगाचा कणा ठरू शकतो.
जागतिक भू-राजकारणात मोठी उलथापालथ शक्य
या शोधामुळे आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलू शकतात. चीनच्या मक्तेदारीला थेट स्पर्धा आणि अमेरिका व यूरोपला नवीन पर्याय मिळू शकतो. यामुळे जागतिक टेक सप्लाय चेन सुरक्षित हातात असेल. शिवाय, भारत हाय-टेक इंडस्ट्रीचे नवीन ग्लोबल हब बनू शकेल. तज्ज्ञांच्या मते, हा रेअर अर्थ साठा पुढील किमान 25 वर्षे भारताच्या तांत्रिक अर्थव्यवस्थेला गती देईल आणि भविष्यातील EV, सेमीकंडक्टर, अंतराळ संशोधन व संरक्षण क्षेत्रातील भारताची ताकद प्रचंड वाढवेल.