राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:56 IST2026-04-30T09:56:31+5:302026-04-30T09:56:58+5:30
पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून संरक्षणमंत्र्यांनी बिश्केक येथे बोलताना पाकिस्तानला एक लाजिरवाणी क्लीन चिट दिली आहे, असा आरोप करत पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र नाही का, असा प्रश्न रमेश यांनी उपस्थित केला.

राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
नवी दिल्ली - देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिश्केक येथे झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) बैठकीत पाकिस्तानला लाजिरवाणी क्लीन चिट दिल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. एससीओ बैठकीत संरक्षणमंत्र्यांनी केलेले धक्कादायक विधान हे देशविरोधी असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
पाकिस्तानबाबतची ही नवी भूमिका म्हणजे अमेरिकेचे तुष्टीकरण करण्याच्या व चीनसमोर सुनियोजित शरणागती पत्करण्याच्या धोरणाचा एक भाग असल्याचा दावा करत काँग्रेसचे संपर्क विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्स या समाज माध्यमाद्वारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. या पोस्टसोबत रमेश यांनी एससीओ येथे राजनाथ सिंह यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला. पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून संरक्षणमंत्र्यांनी बिश्केक येथे बोलताना पाकिस्तानला एक लाजिरवाणी क्लीन चिट दिली आहे, असा आरोप करत पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र नाही का, असा प्रश्न रमेश यांनी उपस्थित केला.
पाकिस्तानमध्ये भारताच्या विरोधात वैचारिक विषारी प्रचार केला जात नाही का? मुंबई आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणणारे दहशतवादी पाकिस्तानचेच नव्हते का? असे रमेश म्हणाले. दरम्यान या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान सिंह यांनी चीनच्या मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.
‘एससीओ’ मध्ये काय म्हणाले संरक्षणमंत्री ?
आपण हे विसरता कामा नये की दहशतवादाला कोणताही देश किंवा कोणताही धर्म नसतो. कोणतीही तक्रार, मग ती खरी असो किंवा काल्पनिक दहशतवादाचे आणि मानवी हानीचे निमित्त ठरू शकत नाही. दहशतवादाची केंद्रे यापुढे न्याय्य शिक्षेपासून वाचू शकणार नाहीत, हा ठाम निर्धार ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने सिद्ध केल्याचे राजनाथ म्हणाले. राज्य प्रायोजित सीमापार दहशतवादाकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन या एससीओला संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी केले.
बिश्केकला घेतली चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट ?
शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची बिश्केक येथे भेट झाली. या बैठकीत उभय नेत्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासोबतच पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बिघडलेले संबंध सुधारण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये डेपसांग आणि डेमचोक येथील सैन्य माघारीच्या करारानंतर दोन्ही देशांमधील संवाद वाढला आहे.