'तुमच्या दुर्बलतेचा परिणाम...', अमेरिकेच्या ५०% टॅरिफवरून राहुल गांधींचे पीएम मोदींवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:49 IST2026-01-23T18:46:48+5:302026-01-23T18:49:28+5:30
Rahul Gandhi on Trump Tariff: 'मोदीजी, या विषयावर तुमची थेट जबाबदारी आहे. कृपया याकडे गांभीर्याने लक्ष द्या.'

'तुमच्या दुर्बलतेचा परिणाम...', अमेरिकेच्या ५०% टॅरिफवरून राहुल गांधींचे पीएम मोदींवर टीकास्त्र
Rahul Gandhi on Trump Tariff: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफमुळे भारतीय वस्त्रोद्योगाला होत असलेल्या नुकसानीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली. 'अमेरिकन टॅरिफमुळे वस्त्रोद्योग प्रचंड अनिश्चिततेत सापडला असून, पंतप्रधानांनी आपल्या दुर्बलतेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडू देऊ नये,' असे राहुल गांधींनी म्हटले.
मानेसरमधील वस्त्रोद्योग कारखान्याला भेट
राहुल गांधी यांनी हरियाणातील गुरुग्रामजवळील एका वस्त्रोद्योग कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कामगार आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला. या दौऱ्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, 'मोदीजी, या विषयावर तुमची थेट जबाबदारी आहे. कृपया याकडे गांभीर्याने लक्ष द्या.'
रोजगाराच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा क्षेत्र
राहुल गांधी पुढे म्हणाले, 'भारतातील वस्त्रोद्योग हा रोजगार निर्मितीच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठे क्षेत्र आहे. भारतीय कपड्यांना जगभर मागणी आहे आणि आपल्या कारागिरांच्या कौशल्याला तोड नाही. मात्र, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे या क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.'
50% US tariffs and uncertainty are badly hurting India’s textile exporters. Job losses, factory shutdowns and reduced orders are a reality of our ‘Dead Economy’.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 23, 2026
Mr. Modi has offered no relief or even spoken about tariffs, even though more than 4.5 crore jobs and lakhs of… pic.twitter.com/5BcG3AZibg
५० टक्के टॅरिफ, सर्व बाजूंनी दबाव
'अमेरिकेने सुमारे ५० टक्के टॅरिफ लावला आहे. युरोपमध्ये किमती घसरत आहेत, बांगलादेश आणि चीनकडून तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग आणि निर्यातदार सर्व बाजूंनी पिळले जात आहेत. याचा थेट परिणाम रोजगारावर होत असून, कारखाने बंद पडत आहेत, ऑर्डर कमी होत आहेत आणि संपूर्ण क्षेत्रात अस्थिरता पसरली आहे', असेही राहुल गांधींनी नमूद केले.
‘डेड इकॉनॉमी’वर पुन्हा टीका
राहुल गांधी पुढे म्हणतात, 'पंतप्रधान मोदींनी ना कोणतीही सवलत दिली आहे, ना टॅरिफवर चर्चा केली आहे. साडेचार कोटींहून अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात असताना सरकार शांत आहे. नोकऱ्यांचा ऱ्हास, कारखाने बंद होणे आणि ऑर्डर कमी होणे, हीच आजच्या ‘डेड इकॉनॉमी’ची वास्तविकता आहे.'
भारत-अमेरिका व्यापार कराराची मागणी
राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले की, 'भारताने अमेरिकेसोबत असा व्यापार करार करणे अत्यावश्यक आहे, ज्यात भारतीय उद्योग आणि भारतीय कामगारांना प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधानांनी आपल्या दुर्बलतेचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडू देऊ नये.'