राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:02 IST2026-02-04T13:59:39+5:302026-02-04T14:02:45+5:30
Rahul Gandhi on General Naravane Book Four Stars of Destiny: जनरल एम. एम. नरवणे यांचे पुस्तक सरकार भारतात प्रकाशित होऊ देत नाहीये, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारत-चीन सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकाचा संदर्भ देत सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकावरून संसदेत मोठा गदारोळ उडालेला आहे. जे पुस्तक प्रकाशितच झाले नाही, त्याचा हवाला देता येणार नाही, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. तर राहुल गांधी यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना ते पुस्तक दाखविले आणि त्यात काय लिहिले आहे ते सांगितले आहे.
संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांचे पुस्तक हातात धरले होते. ते म्हणाले, "देशातील तरुणांनी आणि प्रसारमाध्यमांनी जनरल नरवणे यांचे हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे, हे यात स्पष्टपणे म्हटले आहे. पंतप्रधान म्हणतात तसे 'कोणीही घुसलेले नाही' हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे हे पुस्तक सिद्ध करते."
चीनच्या मुद्द्यावरून थेट हल्लाबोल
राहुल गांधी पुढे म्हणाले की, लडाखमध्ये चीनने भारताची जमीन हडपली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदी चीनच्या मुद्द्यावर गप्प का आहेत? आपले लष्करप्रमुख राहिलेल्या व्यक्तीने आपल्या पुस्तकात जे लिहिले आहे, त्यावर सरकार उत्तर का देत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चीनशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यापासून सरकार पळ काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काय आहे या पुस्तकात...
चीनच्या टँक्सनी भारतीय सीमेत प्रवेश केला असताना पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी लष्करप्रमुखांना वाऱ्यावर सोडले होते, असा दावा राहुल गांधींनी आज संसदेबाहेर केला. जेव्हा चीनचे टँक्स कैलाश रेंजमध्ये आपल्या हद्दीत घुसले, तेव्हा जनरल नरवणे यांनी तात्काळ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला. त्यांनी विचारले की आपण काय करायचे? पण राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी जयशंकर आणि एनएसए (NSA) यांच्याशी चर्चा केली, तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे नरवणे यांनी लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांवरही त्यांनी जबाबदारी झटकल्याचा आरोप केला.
#WATCH | On former Army chief General MM Naravane (Retd)'s "memoir", Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "It's available abroad, I think. It's published abroad. Govt is not allowing it to be published here. That's what I believe...The book is available...You can imagine where the… pic.twitter.com/FJoGKpXB8O
— ANI (@ANI) February 4, 2026
पुस्तक कुठून आले...
माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे (निवृत्त) यांच्या 'आत्मचरित्रा'बद्दल लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "मला वाटते की ते परदेशात उपलब्ध आहे. ते परदेशात प्रकाशित झाले आहे. सरकार त्याला येथे प्रकाशित करू देत नाहीये. माझा असा विश्वास आहे, पुस्तक उपलब्ध आहे. हे पुस्तक कुठून आले असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. ते कुठून आले असेल याचा तुम्ही विचार करा, असे राहुल गांधी म्हणाले.