दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक बिघडली पोलिसांची तब्येत, ६० जणांना केलं रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:44 IST2026-03-13T18:43:29+5:302026-03-13T18:44:08+5:30
Bihar Food Poisoning: बिहारमधील बांका जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलीस लाईनमध्ये दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. तसेच सुमारे ६० जणांना उलट्या, चक्कर, पोटदुखी असा त्रास सुरू झाला.

दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक बिघडली पोलिसांची तब्येत, ६० जणांना केलं रुग्णालयात दाखल
बिहारमधील बांका जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलीस लाईनमध्ये दुपारचं जेवण केल्यानंतर अचानक अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. तसेच सुमारे ६० जणांना उलट्या, चक्कर, पोटदुखी असा त्रास सुरू झाला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून आजारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने बांका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे या जवानांवर उपचार सुरू आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनानही सक्रिय झालं असून, जिल्हाधिकारी नवदीप शुक्ला यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत आजारी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जनच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचं पथक सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार करत आहे. सद्यस्थितीत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच चिंतेची कुठलीही बाब नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस लाईनमध्ये असलेल्या कँटिंनमध्ये जेवणात भात आणि छोले घेतले होते. भोजन केल्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली. सुरुवातीला याकडे सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. मात्र नंतर त्रास वाढल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्राथमिक लक्षणांमधून या पोलिसांना अन्नविषबाधा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.