‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:52 IST2026-04-22T11:51:18+5:302026-04-22T11:52:00+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत.

‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
Pahalgam Terror Attack: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनी दौऱ्यात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, आपले सर्व शेजारी देश चांगले आहेत, फक्त एक अपवाद आहे. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत त्याच्या यशाबद्दल अधिक सांगण्याची गरज नसल्याचेही नमूद केले.
पाकिस्तानला इशारा...
बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. मात्र, कोणताही शेजारी देश भारताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. तसेच, त्यांनी भारताची लष्करी ताकद अधिक सक्षम झाल्याचेही अधोरेखित केले.
Delighted to interact with the members of Indian community in Berlin. The Indian diaspora is the Living Bridge between India and Germany and it has evolved into a strong force in the recent years. During my interaction, I underlined India’s rapid economic growth and technological… pic.twitter.com/p7tCL61F6k
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 22, 2026
भारत-जर्मनी संबंधांवर भर
जर्मनी दौऱ्याबाबत बोलताना सिंह यांनी सांगितले की, हा त्यांचा पहिलाच जर्मनी दौरा आहे. त्यांनी जर्मनीमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला भारत आणि जर्मनी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हटले. तुमची प्रतिष्ठा वाढली तर भारताची प्रतिष्ठाही वाढेल, असेही त्यांनी नमुद केले. तसेच भारत आणि जर्मनी यांचे संबंध केवळ लोकशाहीपुरते मर्यादित नसून, विविध क्षेत्रांत विस्तारलेले असल्याचे म्हटले.
भारत बदलला आहे...
भारताच्या बदलत्या प्रतिमेबाबत बोलताना सिंह म्हणाले, आजचा भारत पूर्वीसारखा राहिलेला नाही. जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टम बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही त्यांनी अधोरेखित केला.
जर्मनी दौऱ्याचा उद्देश
राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत-जर्मनी संरक्षण औद्योगिक सहकार्याचा आराखडा अंतिम करणे हा आहे. बर्लिनमध्ये त्यांनी जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरीस पिस्तोरीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. शेष म्हणजे, भारताच्या संरक्षणमंत्र्यांचा हा जर्मनी दौरा तब्बल सात वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी 2019 मध्ये निर्मला सितारामण यांनी संरक्षणमंत्री म्हणून जर्मनीचा दौरा केला होता.