‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:43 IST2025-12-17T12:41:34+5:302025-12-17T12:43:34+5:30
1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाल्यानंतर एका वर्षातील हा सर्वाधिक आकडा.

‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
MP Tiger Death: देशातील ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमध्येवाघांच्या मृत्यूंचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत (13 डिसेंबरपर्यंत) तब्बल 54 बाघांचा मृत्यू झाला असून, 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाल्यानंतर एका वर्षातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या एका आठवड्यातच राज्यात सहा बाघांचे मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वर्षनिहाय बाघ मृत्यूंची संख्या
वन विभागाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये मागील काही वर्षांतील वाघ मृत्यूंचा कल सातत्याने वाढताना दिसत आहे.
2021: 34 वाघांचा मृत्यू
2022: 43 मृत्यू
2023: 45 मृत्यू
2024: 46 मृत्यू
2025 (13 डिसेंबरपर्यंत): 54 वाघांचा मृत्यू
बहुतांश मृत्यू नैसर्गिक कारणांनी? वन विभागाचा दावा
वन विभागाच्या मते, बहुतांश वाघांचे मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. वाघांची संख्या वाढल्यामुळे नैसर्गिक मृत्यूंचे प्रमाणही वाढते, जे स्वाभाविक आहे. या आधारावर पुढील वाघ गणनेतही मध्य प्रदेश देशातील अग्रगण्य ‘टायगर स्टेट’ राहील, असा दावा करण्यात येत आहे.
बांधवगडमध्ये संशयास्पद मृत्यू, परिसर सील
वाघाच्या मृत्यूची ताजी घटना बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आहे. उमरिया जिल्ह्यातील चंदिया वनपरिक्षेत्रातील कथली नदीच्या काठावर एका वाघाचा मृतदेह आढळून आला. संशयास्पद परिस्थितीत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, चौकशी सुरू आहे. वन कर्मचारी नियमित गस्त आणि जनगणना करत असताना ही घटना उघडकीस आली.
करंट लागून मृत्यूची शक्यता, तपास सुरू
वन विभागाच्या पथकांकडून पुरावे सुरक्षित करण्याचे काम सुरू असून, डॉग स्क्वॉडच्या मदतीने संशयास्पद हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. मृतदेह वीज वाहिन्यांच्या कॉरिडोरजवळ आढळून आल्याने करंट लागून मृत्यू झाला असण्याची शक्यताही तपासली जात आहे.
54 पैकी 36 मृत्यू रहस्यमय, शिकारीचा संशय
या 54 वाघांच्या मृत्यूपैकी तब्बल 36 मृत्यू रहस्यमय असल्याचे समोर आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे. काही घटनांमध्ये वाघांचे पंजे कापून तस्करांनी नेल्याचेही आढळल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात एका बाघाची किंमत सुमारे 1 ते 3 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
कॅमेऱ्यात कैद झाले शिकारी, उपकरणांची चोरी
वाघांच्या संरक्षणासाठी जंगलात बसवलेले कॅमेरा ट्रॅप अनेक वेळा शिकाऱ्यांच्या हालचाली टिपत आहेत. मात्र, काही प्रकरणांमध्ये हे कॅमेरे चोरीला गेल्याचेही समोर आले आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
वाघांच्या सुरक्षेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेश सरकारवर अपयशाचा ठपका ठेवला आहे. काँग्रेस प्रवक्ते अभिनव बबारोलिया यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. दरम्यान, वन राज्यमंत्री दिलीप सिंह अहरवार यांनी विभाग सर्व प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करत असल्याचे सांगितले आहे.