Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:40 IST2026-05-11T15:39:32+5:302026-05-11T15:40:58+5:30
Mithilesh Tiwari Controversial statement: बिहारचे नवे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
बिहारचे नवे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. "मुलींना शिक्षणाची काय गरज आहे?" असे वक्तव्य मिथिलेश तिवारी यांनी केले आहे. यावर विरोधकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मिथिलेश तिवारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मिथिलेश तिवारी यांनी नुकताच शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. राज्यात सध्या 'बीपीएससी टीआरई-४' शिक्षक भरतीच्या मागणीसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आंदोलने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना किंवा एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुलींच्या भूमिकेबद्दल हे विधान केल्याचे समजते. व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी मंत्र्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिथिलेश तिवारी यांच्या विधानानंतर बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे मिथिलेश तिवारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मिलिए बिहार के नए शिक्षा मंत्री से...
— Srinivas BV (@srinivasiyc) May 11, 2026
थूकना मत भूलिए... pic.twitter.com/vpSmFwUWqQ
"एकीकडे देश महिला सक्षमीकरणाच्या बाता मारत आहे, तर दुसरीकडे राज्याचे शिक्षण मंत्री मुलींना पुन्हा चूल आणि मूलापर्यंत मर्यादित ठेवण्याचे विचार मांडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे," अशी टीका विरोधी नेत्यांनी केली आहे. दरम्यान, मिथिलेश तिवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचे पाहायला मिळाले. "जर शिक्षण मंत्र्यांचे विचार असे असतील, तर राज्यातील मुलींच्या शिक्षणाचे भवितव्य काय?" असा सवाल लोक विचारत आहेत.