लोकसभेत महाराष्ट्राकडे लक्ष वेधले

By Admin | Updated: December 18, 2014 05:01 IST2014-12-18T05:01:43+5:302014-12-18T05:01:43+5:30

रंगाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला दर क्विंटल सात हजार रूपये मोबदला

In the Lok Sabha, attention was given to Maharashtra | लोकसभेत महाराष्ट्राकडे लक्ष वेधले

लोकसभेत महाराष्ट्राकडे लक्ष वेधले

नवी दिल्ली : औरंगाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला दर क्विंटल सात हजार रूपये मोबदला मिळावा, कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय, हिंगोली जिल्ह्यातील कनेरगा ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती, मुंबई - बडोदा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाऐवजी सांकरी महामार्ग करावा या व अन्य मागण्यांनी लोकसभेतील शून्यप्रहरावर संपूर्ण महाराष्ट्राची छाया होती. मार्ग हे जीवनरेषा असतात, पण काही रस्ते मृत्यूचे सापळे ठरत आहेत, तेव्हा याकडे लक्ष द्या, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन खर्च आणि मिळणारा मोबदला याचा ताळमेळ सांधा, अशा सूचनाही सरकारला धडाक्यात केल्याने आजच्या शून्यप्रहराने राज्याकडे केंद्राचे लक्ष वेधण्यात आले.
कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय
कोल्हापूरमध्ये २०११ पर्यंत पासपोर्ट कार्यालय होते. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये खाजगीकरणात टीसीएस कंपनीकडे ते चालवायला दिले. तेव्हापासून ते आजतागायत बंद आहे. २५० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यातून संपूर्ण कारभार चालतो, असे सांगून खा. धनंजय महाडिक म्हणाले, एका पासपोर्टसाठी एका कुटुंबाची अपॉइंटमेंट वेगवेगळ््या दिवशी ठरते. पैसा, वेळ खर्च होतो. त्यामुळे कोल्हापुरातील कार्यालय पुन्हा सुरू करावे.
हिंगोलीतील महामार्गाची दुर्दशा
देशातील सर्वात वाईट महामार्ग आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कनेरगा- वारंगा महामार्ग आहे, असे सांगून खा. राजीव सातव म्हणाले, या महामार्गाच्या दुरुस्तीबद्दल यापूर्वी दोनवेळा आपण सदनात बोललो आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी केंद्रातील महासंचालकांनी याबाबत कळवून ७० कोटी रूपयांत दुरूस्ती होऊ शकते, असे म्हटले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही झाल्या, पण हा महामार्ग दुरूस्त केला जात नाही. मागील वर्षभरात एक हजारापेक्षा अधिक अपघात या मार्गावर झाले आहेत.
सांकरी मार्ग करा
मुंबई- अहमदाबाद महामार्गावर आठ पदरी सांकरी महामार्गाचे काम सुरू आहे, त्याला जोडून पुन्हा मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गाची गरज नाही असे खा. चिंतामण वानगा यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: In the Lok Sabha, attention was given to Maharashtra