बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, भाजपा म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:04 IST2026-01-19T18:03:01+5:302026-01-19T18:04:24+5:30
राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे असं संगरेशी यांनी स्पष्ट केले.

बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, भाजपा म्हणते...
बंगळुरू - कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळुरू येथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळुरू एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी.एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निवडणूक लागणार आहे.
जिल्हा पंचायत-पंचायत समिती निवडणूकही बॅलेट पेपरवर
मुख्य निवडणूक अधिकारी जी.एस संगरेशी यांनी म्हटलं की, या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही बॅलेट पेपरने घेतल्या जातील. १० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर २५ मे झाल्यावर स्थानिक निवडणुका घोषित केल्या जातील. यावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल असं त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं कारण स्पष्ट केले नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास कायद्यात कुठेही अडचण नाही त्यामुळे या निवडणुकीत बॅलेटचा वापर केला जाईल इतकेच निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्ष करतात. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात अशाप्रकारे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा संदर्भ ईव्हीएमवरील आरोपांशी जोडला जातो.
तर बॅलेटच्या वापरावर बंदी नाही. अमेरिकेसारख्या विकसित देशातही बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाते. भारतात केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे असं संगरेशी यांनी स्पष्ट केले. मात्र असा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर यामागे अनेक कारणे आहेत असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा निर्णय योग्य आहे हे सांगण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचाही हवाला दिला.
भाजपानं काय दिली प्रतिक्रिया?
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या घोषणेनंतर भाजपाने ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा कडाडून विरोध केला. राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरू झाली. काँग्रेस पक्ष केवळ राहुल गांधींना खुश करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घेत आहे. मात्र निवडणुकीत काँग्रेसचा पराभव स्पष्ट आहे मग ईव्हीएम असो वा बॅलेट पेपर..असा टोला भाजपा प्रवक्ते प्रकाश एस यांनी लगावला.