डाव्यांचा ‘अखेरचा किल्ला’ ढासळला, केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत; नव्या चेहऱ्यांना संधी, यूडीएफसाठी फायद्याची
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:04 IST2026-05-05T09:03:15+5:302026-05-05T09:04:55+5:30
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीतील मोठे बदल हा निर्णायक ठरले. काँग्रेस - नेतृत्वाखालील यूडीएफने धोरणात्मक पद्धतीने ९९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत, सत्ताविरोधी नाराजीला थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

डाव्यांचा ‘अखेरचा किल्ला’ ढासळला, केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत; नव्या चेहऱ्यांना संधी, यूडीएफसाठी फायद्याची
तिरुवनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ)ने स्पष्ट बहुमत मिळवले असून, सीपीआय(एम)च्या नेतृत्त्वाखालील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक आणि तेलंगणानंतर काँग्रेसने केरळमध्येही विजय मिळविला आहे. यामुळे डाव्यांचा अखेरचा किल्लाही ढासळला आहे.
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीतील मोठे बदल हा निर्णायक ठरले. काँग्रेस - नेतृत्वाखालील यूडीएफने धोरणात्मक पद्धतीने ९९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत, सत्ताविरोधी नाराजीला थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आघाडीने केवळ २७ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली, तर १४ आमदारांचे तिकीट कापण्यात आले. याशिवाय, मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या ८५ उमेदवारांना यावेळी संधी देण्यात आली नाही.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या ‘फ्रेश कँडिडेट’ रणनीतीचा उद्देश स्थानिक पातळीवरील नाराजी कमी करणे आणि मतदारांमध्ये नव्या उर्जेची भावना निर्माण करणे, हा होता. त्यात यश मिळाले आहे.
किनारी भागांत मच्छीमारांचा रोष ठरला ‘गेमचेंजर’
किनारपट्टी भागांतील मच्छीमार समुदायाचा कल हा या राजकीय बदलामागील मोठा घटक मानला जात आहे. राज्यातील १४० जागांपैकी जवळपास ४० जागा किनारपट्टीच्या प्रभावाखाली येतात. तिथे १० लाख मच्छीमार मतदार निवडणुकीच्या निकालावर निर्णायक प्रभाव टाकतात. विशेषतः पुनर्वसन व समुद्रापासून अंतर राखण्याच्या प्रस्तावांमुळे अनेक कुटुंबांनी असंतोष व्यक्त केला होता. ज्यामुळे सत्ताधारी एलडीएफविरोधात नाराजीचे वातावरण तयार झाले.
युद्धाचा फटका?
यंदा आखाती देशांत काम करणाऱ्या प्रवासी मतदारांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थितीनेही सत्तासमीकरणांवर परिणाम केला. केरळमध्ये सुमारे २.४२ लाख नोंदणीकृत प्रवासी मतदार आहेत. यंदा पश्चिम आशियातील वाढता तणावामुळे प्रवासी मतदार केरळमध्ये पोहोचू शकले नाहीत.
व्ही.डी. सतीशन हे मागील टर्ममध्ये विरोधीपक्षनेते होते. संघटनेवर मजबूत पकड. यूडीएफचा एक प्रमुख चेहरा आहे.
के. सी. वेणुगोपाल यांचा काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर प्रभाव आहे. पक्षाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मात्र, राज्यातील सक्रीय राजकारण कमी आहे.
रमेश चेन्नीथला हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. अनुभवी नेते. संघटनेवर जुनी पकड आहे.
यंदा कोणता फॅक्टर निर्णायक
राज्यात एलडीएफ सलग दोन टर्म सत्तेत असल्यामुळे काही ठिकाणी सत्ताविरोधी लाटेचा फटका या आघाडीला बसला. अल्पसंख्यांक मतदार मोठ्या प्रमाणात यूडीएफ आघाडीकडे गेला.
केरळमधील हॉट सीट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमान चांडी यांचे चिरंजीव चांडी ओमन हे पुथुपल्ली मतदारसंघातून ५२ हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. हरिपाद मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला हे विजयी झाले आहेत.
गॅस संकटाने केला परिणाम
राज्यातील गॅसची टंचाईही एक महत्त्वाचा निवडणूक मुद्दा ठरला. पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस पुरवठा बाधित झाला आणि त्याचा परिणाम केरळमध्ये घरगुती एलपीजी तसेच व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर झाला. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन क्षेत्राला यामुळे मोठा फटका बसला. ते मतामध्ये परिवर्तीत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.