युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:01 IST2026-04-15T06:45:02+5:302026-04-15T07:01:39+5:30
Iran War: युद्ध आणि तणावाचे काळे ढग आता भारतावर घोंगवत आहेत. युद्धामुळे उद्भवणाऱ्या संकटामुळे चीनमध्ये केवळ ६ लाख लोक गरिबीत जाण्याची शक्यता असताना, भारतात ही संख्या २५ लाखांवर जाण्याची भीती आहे.

युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
नवी दिल्ली - युद्ध आणि तणावाचे काळे ढग आता भारतावर घोंगवत आहेत. युद्धामुळे उद्भवणाऱ्या संकटामुळे चीनमध्ये केवळ ६ लाख लोक गरिबीत जाण्याची शक्यता असताना, भारतात ही संख्या २५ लाखांवर जाण्याची भीती आहे. पाकिस्तानमधील ४ लाख लोकांना याचा फटका बसणार आहे. प्रत्यक्षात युद्ध सुरू असलेल्या इराणमधील ५० लाख लोक गरिबीत जाण्याची भीती असून, त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी)च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
सर्वाधिक फटका कुणाला?
अहवालानुसार, भारतातील ९० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहे. त्यामुळे हॉटेल, अन्नप्रक्रिया, बांधकाम, स्टील व दागिने उद्योग, लघू व मध्यम उद्योग या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
अहवालात काय?
आखाती देशांत ९३.७ लाख भारतीय कामगार आहेत. युद्धाचा परिणाम तेथील रोजगारावर झाला तर भारतात येणाऱ्या चलनात मोठी घट होईल.
औषधाच्या किमतीत १० ते १५ % वाढ झाली, तर वैद्यकीय उपकरणांच्या खर्चात ५० % वाढ झाली.
हिरे, दागिने, कापड आणि स्टील क्षेत्रातील उद्योगांना कच्च्या मालाची टंचाई व वाढीव वाहतूक खर्चाचा सामना करावा लागेल.
खरीप हंगामावर परिणाम
भारत गरजेच्या ९० टक्क्यांहून अधिक तेल आणि ४० टक्क्यांहून अधिक खतांची आयात पश्चिम आशियातून करतो. जर हा संघर्ष लांबला, तर आगामी ‘खरीप’ हंगामावर त्याचे गंभीर परिणाम होतील. युरिया उत्पादनासाठी लागणारा नैसर्गिक वायू आणि तयार खतांचा पुरवठा विस्कळीत झाल्यास शेतीचा खर्च वाढून अन्नधान्य महाग होऊ शकते.
महागाई, बेरोजगारीचे संकट
इंधन, मालवाहतूक व कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होणार आहे. यामुळे खरेदी क्षमता कमी होत असून, अन्नसुरक्षेचा प्रश्न वाढत आहे. गरिबांची एकूण संख्या ३५ कोटींच्या पार जाण्याचा अंदाज आहे.