इराण म्हणाला, 'भारत आमचा मित्र', आता होर्मुझची सामुद्रधुनी भारतीय जहाजांसाठी खुली होणार? दिले असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 20:06 IST2026-03-13T20:04:56+5:302026-03-13T20:06:34+5:30
Iran War Update: अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केल्याने भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारताला दिलासा देणारं मोठं विधान केलं आहे.

इराण म्हणाला, 'भारत आमचा मित्र', आता होर्मुझची सामुद्रधुनी भारतीय जहाजांसाठी खुली होणार? दिले असे संकेत
अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी करत संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या होर्मुझमधील वाट इराणने रोखल्याने जगभरात खनिज तेल आणि नैसर्गित वायूची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवू लागली आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसला असून, देशात एलपीजीच्या तुटवड्याचं संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत चाललं आहे. अशा परिस्थितीत इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारताला दिलासा देणारं मोठं विधान केलं आहे.
ते म्हणाले की, जगातील इतर देशांची भूमिका काहीही असो, मात्र भारतासोबत इराणचे संबंध अतूट आहेत. या मैत्रीचा परिणाम पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण जगाला दिसणार आहे. भारतीय लोकांना होणार त्रास हा आम्हाला होणारा त्रास आहे, असेही मोहम्मद फथाली यांनी सांगितले. फथाली यांच्या विधानाकडे होर्मुझची सामुद्रधुनी भारताच्या तेल वाहतुकीसाठी खुली होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
फथाली हे पुढे म्हणाले की, भारत आणि इराणध्ये ज्या पातळीवर चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम पुढच्या एक, दोन, तीन दिवसामध्ये सर्वांसमोर असेल. हे परिणाम भारतीय खलाशांची सुटका, खनिज तेलाचा पुरवठा आणि युद्ध टाळण्यासाठी भारताची मध्यस्थी अशा स्वरूपाचा असू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणच्या उच्चाधिकाऱ्यांनी भारत सरकारसोबत मिळून सर्व प्रकारच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत,असेही फथाली म्हणाले.