राम मंदिर लोकार्पणानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल, अर्थव्यवस्थेची मोठी झेप; IIMचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:30 IST2026-02-18T19:29:11+5:302026-02-18T19:30:51+5:30
Ram Mandir Ayodhya: या अहवालानुसार, पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे.

राम मंदिर लोकार्पणानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल, अर्थव्यवस्थेची मोठी झेप; IIMचा अहवाल
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधि भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामललाचे दर्शन घेण्याची आस आजही भाविकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता एका आयआयएमच्या अहवालानुसार, राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल झाल्याचे म्हटले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
राम मंदिराच्या लोकार्पणानंतर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे. आयआयएम लखनऊच्या एका केस स्टडीतून असे दिसून आले आहे की, राम मंदिर बांधण्यापूर्वी अयोध्येची ओळख प्रामुख्याने एका पवित्र तीर्थस्थळापुरती मर्यादित होती. परंतु, लोकार्पण झाल्यानंतर येथील आर्थिक घडामोडींमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. आयआयएम लखनऊच्या केस स्टडीत राम मंदिराच्या बांधकामापूर्वी आणि नंतरच्या आर्थिक परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण दिले आहे.
पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसुलात लक्षणीय वाढ
या अहवालानुसार, पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटन-आधारित उपक्रमांमधून मिळणारे कर महसूल २० हजार ते २५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज आहे. आदरातिथ्य, बांधकाम, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढल्या आहेत. पुढील ४ ते ५ वर्षांत पर्यटन, वाहतूक आणि आतिथ्य क्षेत्रात अंदाजे १.२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे.
राम मंदिर लोकार्पणानंतर देशभरात १ लाख कोटींची उलाढाल
राम मंदिराच्या लोकार्पणामुळे देशभरात ₹१ लाख कोटींहून अधिक व्यवसायिक उलाढाल झाली, ज्यामध्ये अयोध्येने महत्त्वाची भूमिका बजावली. दररोज येणाऱ्या २००,००० हून अधिक भाविकांच्या गर्दीमुळे हॉटेल आणि संबंधित उद्योगांना चालना मिळाली आहे. अयोध्येत १५० हून अधिक नवीन हॉटेल्स आणि होमस्टे उघडले आहेत. राम नगरीतही प्रमुख हॉटेल साखळ्यांचा विस्तार होत आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरील बुकिंगमध्ये चौपट वाढ झाली आहे.
दरम्यान, स्थानिक हस्तकला, धार्मिक स्मृतिचिन्हे आणि मूर्तींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट फायदा कारागीर आणि स्थानिक उत्पादकांना झाला आहे. जवळपास ६,००० एमएसएमई स्थापन झाले आहेत. अभ्यासात असे म्हटले आहे की, लहान दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचे दैनिक उत्पन्न २,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.