भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:48 IST2026-04-28T14:48:19+5:302026-04-28T14:48:42+5:30
Weather: सध्या निसर्गाचं अजब चक्र पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दिवसांत आशिया खंडातील भारत आणि चीन या एकमेकांच्या शेजारी असलेल्या बड्या देशांमध्ये परस्परविरोधी हवामान दिसून येत आहे.

भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
सध्या निसर्गाचं अजब चक्र पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दिवसांत आशिया खंडातील भारत आणि चीन या एकमेकांच्या शेजारी असलेल्या बड्या देशांमध्ये परस्परविरोधी हवामान दिसून येत आहे. एकीकडे भारतात उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ डिग्रीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तर तिकडे चीनच्या ग्वांशी प्रांतातील क्विनझाऊ शहरामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते, वाहने, घरे पाण्याखाली गेली आहेत.
२७ एप्रिल रोजी केवळ ८ तासांमध्ये २७३ मिमी पाऊस पडला आहे. त्यात एका तासामध्ये तब्बल १६० मिमी एवढा पाऊस पडला आहे. हा एप्रिल महिन्यात पडलेला रेकॉर्डब्रेक पाऊस होता. या पावसामुळे रस्ते बंद झाले आहेत. शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यानंतर मदतकार्य सुरू झालं आहे. त्यामुळे एकमेकांशेजारी असलेल्या दोन देशांमधील वातावरणात एवढा टोकाचा फरक कसा काय दिसून येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारताच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात सध्या उष्णतेची लाट आलेलाी आहे. दुसरीकडे चीनमधील ग्वांशी प्रांतात २७ एप्रिल रोजी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. या पावसामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.