लोकसभेतील भाजपचा प्रत्येक सहावा खासदार ‘व्होटचोरी’द्वारे जिंकला : राहुल गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:25 IST2026-05-07T08:24:11+5:302026-05-07T08:25:58+5:30
लोकसभेतील भाजपच्या २४० खासदारांपैकी, साधारणपणे प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करूनच जागा मिळवली आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकसभेतील भाजपचा प्रत्येक सहावा खासदार ‘व्होटचोरी’द्वारे जिंकला : राहुल गांधी यांची टीका
नवी दिल्ली : लोकसभेतील भाजपच्या प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करून विजय मिळवला आहे. तसेच, खुद्द भाजपच्याच भाषेत त्यांना घुसखोर असे संबोधले जावे का, असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी उपस्थित केला. जर निष्पक्ष निवडणुका झाल्या, तर भाजपला आज लोकसभेत १४० जागाही जिंकता येणार नाहीत. मतचोरीच्या माध्यमातून, कधी एखादी वैयक्तिक जागा चोरली जाते, तर कधी संपूर्ण सरकारच चोरले जाते. लोकसभेतील भाजपच्या २४० खासदारांपैकी, साधारणपणे प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करूनच जागा मिळवली आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
परदेशी कोट्यातून डल्ला! रेल्वेचा १२१ प्रवाशांना मोठा दंड; पाहा कसा होत होता तिकिटांचा गैरवापर
त्यांना ओळखणे कठीण नाही. खुद्द भाजपच्याच भाषेत सांगायचे तर, आपण त्यांना ‘घुसखोर’ असे संबोधले पाहिजे का? आणि हरयाणाचे काय? तिथे तर संपूर्ण सरकारच एक ‘घुसखोर’ आहे. ज्या संस्थांना ते आपल्या खिशात घालून फिरतात- ज्यांचा वापर करून ते मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करतात- त्या संस्थाच मुळात ‘रिमोट-कंट्रोल्ड’ आहेत. त्यांची खरी भीती म्हणजे ‘सत्य’. कारण जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या, तर त्यांना आज १४० जागाही जिंकता आल्या नसत्या, असे ते म्हणाले. त्यांनी तृणमूलच्या समर्थनासाठीही भूमिका घेतली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपसमोर तृणमूलचा मोठा पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आपले क्षुद्र राजकारण बाजूला ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा
काँग्रेसमधील काही जण तसेच इतर काही जण तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करत आहेत. त्यांनी ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की, आसाम आणि बंगालचा जनादेश चोरणे, हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे.
क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. हा मुद्दा एखाद्या विशिष्ट पक्षाचा नाही. हा मुद्दा भारताचा आहे, असे त्यांनी नमूद केले.