आयपीएल २०२६ च्या हंगामात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या पंजाब किंग्सला पराभवाच ग्रहण लागलं आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 'सरपंच' श्रेयस अय्यरच्या संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यासह पंजाब किंग्सच्या संघाने 'नंबर वन'चा ताजही गमावला. सामन्यानंतर श्रेयस अय्यरनं क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडल्याचे मान्य केले. ही पराभवाची मालिका खंडीत करत दमदार पुनरागमन करण्यासाठी आता चुका सुधारण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करताना त्याने आपल्या संघातील खेळाडूंना खास मंत्र जपण्याचा सल्लाही दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कूपर कॉलॉनीचं नाबाद शतक, पण...
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत २०२ धावा केल्या. कूपर कॉलॉनीच्या शतकी खेळीशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. खेळपट्टी संथ झाल्यामुळे फलंदाजी करणं अवघड झाले होते, असेही श्रेयस अय्यरने म्हटले आहे.
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
श्रेयस अय्यरनं सांगितलं पराभवामागचं कारण
सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही अनेक सोपे झेल सोडले. जर क्षेत्ररक्षण चांगले झाले असते तर सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या धावफलकावर ३०-४० धावा कमी लागल्या असत्या. त्यात फलंदाजीवेळी खेळपट्टी संथ झाली. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं अधिक कठीण झाले. आम्ही तिन्ही क्षेत्रात कमी पडलो. याउलट सनरायझर्स हैदराबादच्या संघाने सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत सामना कसा जिंकायचा ते दाखवून दिले, असा उल्लेखही त्याने केला.
एकजुटीचा मंत्र जपण्याचा सल्ला
आम्ही यंदाच्या हगामात चांगली सुरुवात केली. पण मागील तीन सामन्यात सातत्याने चुका केल्या. त्या चुका ओळखून त्यात सुधारणा करावी लागेल. मजबूत पुनरागमन करण्यासाठी एकजुटीनं खेळण्याची गरज आहे, हा मंत्र जपण्याचा सल्लाच कर्णधाराने पराभवातून सावरण्यासाठी आपल्या संघाला दिला आहे. कूपर कॉलॉनीवर स्तुती सुमनांचा वर्षाव करताना तो म्हणाला की, तो खरंच एक प्रतिभावंत खेळाडू आहे. दबावात आत्मविश्वासाने कसे खेळायचे? ही गोष्ट संघातील प्रत्येकाने त्याच्याकडून शिकण्याजोगी आहे.