ऑनलाइन टीमअटारी (पंजाब), दि. २२ - पंजाबमधील वाघा बॉर्डरवर ध्वज संचलनादरम्यान पाकिस्तानच्या ढोल पथकाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा पथकानेही ढोल पथक स्थापन केले आहे. दोन्ही देशांमधील ढोल पथकांच्या या जुगलबंदीमुळे ध्वजसंचलनाचा कार्यक्रम हा आणखी रंगतदार बनला आहे.
पंजाबमधील अमृतसरपासून तीस किलोमिटर अंतरावर अटारी येथे भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना वेगळे करणारी वाघा बॉर्डर आहे. वाघा बॉर्डरवरील दोन्ही देशाच्या जवानांकड़ून केले जाणारे ध्वजसंचलन हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पाकिस्तान कडून ध्वज उतरवण्याच्या वेळेस ढोल वाजवले जातात. पाकिस्तानच्या या ढोल पथकाला 'जशास तसे' उत्तर देण्यासाठी आता भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ढोल पथक तयार केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना डि. आय. जी एम.एफ. फारुकी यांनी म्हणाले, काही दिवसांपूर्वी आम्हीदेखील ढोल पथकाच्या तालावर संचलन करण्याचा प्रयोग करुन बघितला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता हे पथक कायमस्वरुपी नेमण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संचालनादरम्यान सैनिकांच्या पायांच्या आवाजानूसार ढोल वाजवले जातात. ढोलच्या तालावरील संचलनामुळे कार्यक्रमही रंगतदार बनतो व आपल्या जवानांच्या ढोल पथकाच्या आवाजाने भारतीय हद्दही दुमदुमून जाते. त्यामुळे भारतीयांना आता पाकिस्तानऐवजी स्वदेशी ढोलचा ताल ऐकायला मिळतो असे फारुकी सांगतात.
वाघा बॉर्डरवर बीएसएफचे जवान तैनात असून पाकिस्तानमधून पाकिस्तान रेंजर्सचे जवान तैनात असतात. दोन्ही देशांचे जवान दररोज संध्याकाळी संयुक्त संचलन करतात. हे संचलन बघण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. त्यांना या संचालनाबद्दल माहिती मिळावी म्हणून हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषेत संचालनाबद्दल माहिती देणारी रेकॉर्डींग वाजवण्यात येणार असून लोकांना व्यवस्थित बसून संचालन बघता यावे म्हणून भव्य प्रेक्षक गॅलरीही बांधण्यात येणार असल्याचे फारुकी यांनी सांगितले.