चेन्नईत मोठी दुर्घटना! महाराष्ट्रातील मुले समुद्रात बुडाली; तरूणीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:01 IST2026-02-22T14:00:34+5:302026-02-22T14:01:22+5:30
तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

चेन्नईत मोठी दुर्घटना! महाराष्ट्रातील मुले समुद्रात बुडाली; तरूणीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू अन्...
चेन्नई - शहरातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मुलांसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. सुट्टी निमित्त चेन्नईच्या गोल्डन बीचवर फिरायला गेलेल्या २६ तरूणांपैकी तिघेजण पाण्यात वाहून गेले. त्यातील भंडारा येथील मुलीचा मृतदेह सापडला आहे. एका मुलाचा अद्याप शोध सुरू असून एकाला सुखरुप वाचवले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला. स्थानिक सरकारकडून सध्या समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारही या घटनेवर लक्ष ठेवून असून पीडित कुटुंबाला लागणारी सर्व मदत करण्यासाठी संपर्क केला जात आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीय की, चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली. या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून मी मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहे. तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. राज केदारी याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.
चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2026
त्याशिवाय जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे असंही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.
१५ दिवसांपूर्वी लागली नोकरी अन् आज दुर्दैवी अंत
दरम्यान, या घटनेतील मृत मयुरी चौधरी हिच्या निधनानंतर भंडारा येथील तिच्या घरी शोककळा पसरली आहे. मयुरीच्या निधनाची माहिती तिच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीकडून घरच्यांना मिळाली. १५ दिवसांपूर्वीच मयुरी नोकरीला लागली होती. शनिवारी सुट्टी असल्याने मुयरी इतर सहकाऱ्यांसोबत फिरायला गेली होती. सकाळी ७ च्या सुमारास या घटनेविषयी मला माहिती मिळाली. माझे वडील, दादा आणि वडिलांचे मित्र चेन्नईला गेले आहेत अशी माहिती तिच्या भावाने माध्यमांना दिली.