'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 08:35 IST2026-05-11T08:33:10+5:302026-05-11T08:35:35+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिला सुरक्षा अन् कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यात त्यांनी महिलांची सुरक्षा, अमली पदार्थांशी संबंधित धोरण याबाबत सूचना केल्या. अशा बैठका सातत्याने घेतल्या जातील, असेही त्यांनी सूचित केले.
शपथविधीत केले भाषण अन् ...
राज्यपालांनी शपथ देण्यास प्रारंभकरताच विजय यांनी मध्येच आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी भाषण सुरू केले. राज्यपालांच्या लक्षात येताच त्यांनी हस्तक्षेप करीत शपथविधीचे मूळ प्रारूप कायम ठेवून अधिकृत शपथ घेण्याची सूचना विजय यांना केली. शपथ घेतल्यानंतर उजवा हात उंचावून त्यांनी शक्तीचे प्रतीक दाखवले.
'मीच एकमेव केंद्र'
राज्यात सत्तेचे एकच केंद्र असेल. आपल्या सरकारमध्ये आपणच एकमेव 'सत्ता केंद्र' असू, असे विजय यांनी रविवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी राज्यात नव्या युगाचा प्रारंभ झाला असल्याचे नमूद केले.
मोदींनी दिल्या शुभेच्छा
तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी विजय यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. जनतेच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी तमिळनाडू सरकारसोबत एकत्रितपणे काम करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण महिला मंत्री २९ वर्षीय कीर्तना यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अस्खलित हिंदी बोलत 'आता सरकार कसे चालवले जाते हे आम्ही जगाला दाखवून देऊ', असे त्या म्हणाल्या. तमिळसह पाच भाषा अवगत असलेल्या कीर्तना यांनी आय-पॅक व शोटाईम कन्स्टल्टिंगसारख्या कंपन्यांत डिजिटल रणनीतीकार म्हणून काम केले आहे.
भाकपला आला राग...
तामिळनाडूत टीव्हीकेचे अध्यक्ष व मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या शपथविधीच्या वेळी सर्वप्रथम 'वंदे मातरम', त्यानंतर 'जन गण मन' आणि शेवटी 'तमिळ थाई वाझथू' हे राज्याचे गीत गाण्यात आले. यावरून भाकपने तीव्र नाराजी व्यक्त केली.
'वंदे मातरम्' हे गीत एका विशिष्ट देवतेला समर्पित असल्याचे व यात सांप्रदायिक धार्मिक चरित्राचा उल्लेख असल्याचे माकपचे राज्य सचिव एम. वीरपांडियन यांनी म्हटले आहे.
कोण म्हणते कर्ज आहे?
मुख्यमंत्री विजय यांनी मागील सरकारने १० लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले असल्याचा आरोप केला होता. यावर माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हे कर्ज मर्यादेतच असल्याचे स्पष्ट केले.