Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:25 IST2026-04-18T14:22:30+5:302026-04-18T14:25:35+5:30
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर पाच जणांनी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली.

AI Image
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर पाच बंदूकधाऱ्यांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँकेत घुसून दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला आणि काही मिनिटांतच लाखो रुपयांची रोकड व सोने लुटून पसार झाले. या धाडसी दरोड्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच सशस्त्र दरोडेखोर मुखवटे घालून बँकेच्या शाखेत घुसले. बँकेत प्रवेश करताच त्यांनी कर्मचारी आणि ग्राहकांवर बंदूक रोखून दहशत निर्माण केली. उपस्थितांना घाबरवण्यासाठी आरोपींनी हवेत गोळीबार केल्याचाही आरोप आहे, ज्यामुळे बँकेत एकच घबराट पसरली. अवघ्या काही मिनिटांतच दरोडेखोरांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि बँकेतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
Daylight armed robbery at Bank of Maharashtra in Singrauli, Madhya Pradesh: 5 masked men stormed the branch, assaulted staff, fired shots, and looted 9-10 kg of gold plus ₹20 lakh cash (total ₹30-35 lakh). CCTV captured the daring heist in broad daylight. pic.twitter.com/qDiW8zNulP
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 17, 2026
ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये मुखवटाधारी व्यक्ती अत्यंत वेगाने हालचाल करताना आणि कर्मचाऱ्यांना धमकावताना दिसत आहेत. दरोड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी बँकेची नाकाबंदी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी ज्या दिशेने पळाले, त्या मार्गावरील इतर सीसीटीव्ही तपासले जात असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी बँक लुटल्याच्या या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.