प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:10 IST2026-04-13T12:09:58+5:302026-04-13T12:10:27+5:30
अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव नियंत्रणाबाहेर गेला तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सॅलरी वाढवणे आणि कामकाजात सुधारणा आणणे या मागण्यांसाठी खासगी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. ज्यातून नोएडाच्या सेक्टर ६० आणि ६२ परिसरात रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे ऑफिसला जाणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दगडफेक अन् जाळपोळ
कर्मचाऱ्यांचे आंदोलन इतके बिघडले की अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दगडफेक सुरू केली. वाहनांना आग लावली. नोएडाच्या फेज २ मध्येही प्रचंड तोडफोड करण्यात आली. सेक्टर ८४ मध्ये २ वाहनांना आग लावण्यात आली. या हिंसक आंदोलनात मोठ्या प्रमाणात संपत्तीचे नुकसान झाले. इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले.
कर्मचाऱ्यांची मागणी काय?
कंपनी व्यवस्थापनाची मनमानी, पगार कपात करणे आणि कामकाजात अनियमितता याविरोधात मदरसन कंपनीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कंपनीने आंदोलन सुरू केले. पगारात वाढ करणे आणि कामकाजात सुधारणा आणण्याची मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. वाढत्या महागाईत सध्याच्या पगारात घर चालवणे कठीण होत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आंदोलनस्थळी परिस्थिती बिघडल्यानंतर पोलीस आणि प्रशासन सक्रीय झाले. अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव नियंत्रणाबाहेर गेला तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या आंदोलनात पोलिसांच्या एका वाहनालाही नुकसान पोहचवण्यात आले. ज्याचे व्हिडिओ आता समोर आलेत.
दरम्यान, याआधीही गुरुग्रामच्या औद्योगिक क्षेत्रातील IMT मानेसरमध्ये कर्मचाऱ्यांनी अलीकडेच मोठे आंदोलन केले होते. परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने कलम १६३ लागू केले होते. मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना रस्ते मोकळे करण्याची विनंती केली तरी आंदोलक त्यांच्या मागण्यांवर अडून राहिले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तेव्हा आंदोलनस्थळी गोंधळ उडाला होता.