चेन्नई : तामिळनाडूच्याराजकारणात मंगळवारी उलथापालथ घडली. अण्णाद्रमुकमध्ये संघर्ष उफाळलेला दिसून आला. पक्षप्रमुख के. पलानीस्वामी यांच्याविरोधात बंड पुकारलेल्या ३० आमदारांनी अभिनेता-विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
वरिष्ठ नेते एस. पी. वेलुमनी, सी. वे. शन्मुगम यांच्या नेतृत्वाखालील गटाने पलानीस्वामींवर द्रमुकसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला. याबाबत शन्मुगम म्हणाले की, ते विजय यांची भेट घेऊन त्यांच्या सरकारला पाठिंबा देणारे पत्र सादर करणार आहेत.
‘अण्णाद्रमुकची स्थापना द्रमुकला विरोध करण्यासाठी आणि त्यांना सत्तेतून दूर करण्यासाठी झाली होती. अशा पक्षाने द्रमुकच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करावे, ही पक्षाच्या मूलभूत विचारसरणीविरोधातील भूमिका आहे,’ ‘अम्मा’ जयललितांचे विचार पुन्हा पक्षात परतले पाहिजेत म्हणून टीव्हीकेसोबत जायचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.
आमदारांना कडक तंबी
अण्णाद्रमुकने आपल्या सर्व आमदारांना आज होणाऱ्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचा पक्षादेश काढला आहे. जे आमदार बंडखोरी करतील त्यांच्याविरोधात कडक पावले उचलली जातील. गरज पडल्यास गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा पक्षाने दिला आहे.
प्रभाकर विधानसभा अध्यक्ष
आमदार जे. सी. डी. प्रभाकर यांची मंगळवारी तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर विधानसभेची बैठक बोलावण्यात आली. यात निवडीची घोषणा करण्यात आली.
पदभार स्वीकारल्यानंतर नवे अध्यक्ष प्रभाकर यांनी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी टीव्हीकेचे आमदार एम. रविशंकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.