नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. यावेळी थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असून, उत्तर प्रदेशातील घटना-घडामोडी पाहता देशवासीयांना आता जुलमी सत्तेविरुद्ध नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात एक कोटी शेतकरीवर्गाच्या स'ांच्या निवेदनाचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी थोरात पुढे म्हणाले, मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बलात्कारप्रकरणी केलेली दडपशाही निंदणीय असून, योगी सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे. मोदी सरकारने शेतकरीविरोधी कायदे केल्याने हे सरकार जनतेच्या व शेतकरी बांधव तसेच महिलावर्गाच्या मनातून उतरले आहे. कांदा उत्पादकांनादेखील कोणत्याही प्रकारचे दर वाढलेले नसतानाही कांदा निर्यातबंदी करून अडचणीत आणले आहे. केवळ मोठ्या उद्योगपतींना फायदा व्हावा या हेतूने सर्वच देशात बाजार समिती व्यवस्था मोडीत काढली जात असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.सोशल डिस्टन्स ठेवत आंदोलनआंदोलनात महाराष्ट्राचे प्रभारी ए. टी. पाटील, सौ. जयश्री पाटील, महाराष्ट्र युवक कॉँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर, राजाभाऊ पानगव्हाणे, जिल्हा सरचिटणीस दिगंबर गिते, माजी आमदार शिरीष कोतवाल, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, प्रसाद हिरे, विकास चांदर, संजय होळकर, अनिल आहेर, हिरामण खोसकर, अश्विनी बोरस्ते, जगदीश होळकर, पंढरीनाथ थोरे आदींसह कॉँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या या धरणे आंदोलनात सुमारे दोन हजार शेतकरी व महिला सोशल डिस्टन्स सांभाळत व मास्कसह सहभागी झाल्या होत्या.