नाशिकमध्ये दहावीचा पेपर देऊन बाहेर येताच विद्यार्थ्याचे फोडले डोके, पंधरा वर्षीय मुलगा गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:30 IST2026-03-12T15:26:22+5:302026-03-12T15:30:35+5:30
Nashik Crime news: घटनेने सीबीएस परिसरात जिल्हा न्यायालयासमोर एकच धावपळ उडाली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थ्याला बघून अन्य विद्यार्थिनीही भेदरल्या होत्या.

नाशिकमध्ये दहावीचा पेपर देऊन बाहेर येताच विद्यार्थ्याचे फोडले डोके, पंधरा वर्षीय मुलगा गंभीर
Nashik Crime: सीबीएस परिसरातील एका शाळेतून दहावीचा पेपर देऊन बाहेर पडलेल्या उर्दू शाळेच्या एका विद्यार्थ्यावर अज्ञात सात ते आठ मुलांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (११ मार्च) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने सीबीएस परिसरात जिल्हा न्यायालयासमोर एकच धावपळ उडाली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थ्याला बघून अन्य विद्यार्थिनीही भेदरल्या होत्या. जागरूक नागरिकांनी त्यास तत्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जुने नाशिक भागातील एका उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचे दहावीचे परीक्षा केंद्र हे सीबीएस येथील एका शाळेत असल्याने परीक्षार्थी विद्यार्थी पेपर देण्यासाठी बुधवारी आले होते. त्यामध्ये जखमी विद्यार्थ्याचाही समावेश होता.
पाठीमागून आले आणि हल्ला केला
जखमीचा जबाब पोलिसांनी नोंदविला असता, शालेय गणवेशातील मारेकऱ्यांपैकी एकाही मुलाला तो ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. होमगार्ड कार्यालयाबाहेर मारेकऱ्यांनी पाठीमागून येत शस्त्राने त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केल्याने त्यास गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला.
दरम्यान, याप्रकरणी जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या शिक्षकांना जाब विचारत धारेवर धरले. मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात शालेय गणवेशातील अज्ञात मारेकरी मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य मुलांसोबत झालेल्या भांडणाची कुरापत
दोन दिवसांपूर्वी या केंद्राच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि परीक्षा देण्यासाठी येथे आलेल्या उर्दू शाळेच्या काही विद्यार्थ्यांसोबत भांडण झाले होते; ते भांडण शिक्षकांनी पालकांना बोलावून घेत मिटविले होते; मात्र त्या भांडणाचा राग मनात धरून काही शाळकरी विद्यार्थ्यांच्या टोळक्याने उर्दू शाळेचा गणवेश घातलेल्या वडाळ्यातील रहिवासी असलेला विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
धारदार वस्तूने डोक्यात प्रहार करून गंभीर दुखापत केली; मात्र हा विद्यार्थी दोन दिवसांपूर्वीच्या भांडणात नव्हता, असे सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले.