पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:06+5:302021-07-30T04:14:06+5:30

इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ...

Farmers are aggressive due to non-receipt of crop insurance | पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत पंचनामेदेखील केले होते. परंतु संबंधित विमा कंपनीने याकडे डोळेझाक करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत विमा रक्कम जमा न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून सदर नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून सदर विमा रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी यासाठी इगतपुरी तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा न केल्यास काही दिवसात शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इगतपुरी तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष, माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवेदनात दिला आहे.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संदीप गुळवे, गोरख बोडके, सरपंच हरिश्चंद्र चव्हाण तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

छायाचित्र - २९ नांदूर

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीचे निवेदन नरहरी झिरवाळ यांना देताना हरिश्चंद्र चव्हाण. समवेत गोरख बोडके, ॲड. संदीप गुळवे व शेतकरी.

290721\29nsk_8_29072021_13.jpg

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीचे निवेदन नरहरी झिरवाळ यांना देतांना हरिश्चंद्र चव्हाण. समवेत गोरख बोडके, ॲड. संदिप गुळवे व  शेतकरी.

Web Title: Farmers are aggressive due to non-receipt of crop insurance