संपत्तीपेक्षा उत्तम संतती महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:52 IST2021-01-22T20:05:43+5:302021-01-23T00:52:43+5:30
ओझर टाऊनशिप : सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या शिकवणीपासून आजची मुले दुरावत चालली आहेत. मुलांना चांगले आणि वाईट याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ही समज त्यांना येण्यासाठी त्यांना सत्संग आवश्यक आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक आहे, संपत्तीपेक्षा चांगली संतती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

संपत्तीपेक्षा उत्तम संतती महत्त्वाची
ओझर येथील संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आश्रमात आयोजित सत्संग सोहळ्याप्रसंगी परिसरातील लहान मुलांना त्यांच्या माता-पित्यासह विशेष निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी पालखी पूजन, संत पूजन, अतिथी पूजन याबरोबरच उपास्थित बालकांचे पूजन ब्रह्मवृंदांच्या मंत्र घोषात करण्यात आले. उपस्थित बालकांना आणि त्यांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन करताना शांतिगिरीजी महाराज म्हणाले, भविकांनी पैसे जरूर कमवावेत. मात्र, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे याप्रमाणे प्रामाणिकपणे कष्ट करून धन कमवावे. आपले खरे धन आपली मुले आहेत. त्यांना संस्कारक्षम करा, त्यांना सत्संगात नित्य पाठवा. तरच तुम्ही कमविलेल्या धनाचा उपयोग आहे. भविकांनी ह्यसंपत्तीह्ण कमविण्यापेक्षाही ह्यसंततीह्ण कमविण्याकडे लक्ष द्यावे. लहान मुले म्हणजे देवाचे दुसरे रूप आहे. मात्र त्यांना संस्कारित करणे आवश्यक आहे. मुलांनी आपल्या आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे, त्यांच्या आज्ञाचे विनम्रपणे पालन करावे. संगत आणि पंगत सांभाळावी, असेही महाराजांनी सांगितले. यावेळी उपस्थित लहान मुलांचे विशेष पूजन करवून त्यांना फळे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.