‘कंजाळा’च्या जैवविविधतेून स्वावलंबनाचा मार्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:21 PM2020-05-22T12:21:01+5:302020-05-22T12:21:11+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींनी जैवविविधता जोपासली असून त्याचा राज्यस्तरावर देखील सन्मान झाला आहे. ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींनी जैवविविधता जोपासली असून त्याचा राज्यस्तरावर देखील सन्मान झाला आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील कंजाळा, पळासखोब्रा, डेब्रामाळ, सांबर आणि वेलखेडी येथील जैवविविधता समित्यांद्वारे व्यवस्थापित केलेल्या या केंद्रामध्ये वन्य भाजीपाल्याचे ५५ वाण, कंदांचे १२ प्रकार, १८ प्रकारची फळे, २८ प्रकारचे वन फळ, ३७ प्रकारची औषधी जतन केले आहे. शिवाय पक्ष्यांच्या ३५ प्रजाती, प्राण्यांच्या १५ प्रजाती इतर ४९ प्रकारच्या गोष्टींचे जतन या समुहाने केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले उद्योगधंदे, रहदारी, व्यवसाय याचा परिणाम देखील या भागातील जैवविविधतेवर झाला आहे. त्याचाही उपयोग करून घेण्यात आला आहे. जैवविविधतेचे महत्व जाणून रामसिंग वळवी यांनी १९९८ मध्ये एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ या स्वयंसेवी संस्थेमार्फत संयुक्त वन व्यवस्थापनाचे काम करण्यास सुरवात केली. झाडाचे लाकूड किंवा फळ इत्यादींमुळे गाव जैवविविधता नोंदणीकडे गेले. एकेकाळी प्रदेशातील मुख्य आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनवणा वन भाज्या या प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा जिवंत झाल्या. त्यांनी कृषी-विपणन सहकारी संस्था देखील स्थापन केली. गेल्या वर्षी मेरली येथे जैवविविधता संवर्धन, प्रदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले. जे हे लोक सरकार किंवा अनुदानाच्या संस्थेच्या अनुदानाशिवाय व्यवस्थापन करतात. त्यांनी स्वत:हून या केंद्राचे व्यवस्थापन करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून आदिवासी कुटूंबांना स्वावलंबी आणि आर्थिक उत्पन्नाचा मार्ग सुकर करण्याचाही उपाय या निमित्ताने उपलब्ध झाला आहे.
जैवविविधता केंद्रासाठी राज्य जैवविविधता मंडळाचा विशेष पुरस्कार रामसिंग वळवी यांना मिळालेला आहे.
स्वच्छ पर्यावरण....
लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच भागात पर्यावरणाचा स्तर सुधारला आहे. परंतु सातपुड्यातील या भागात नेहमीच स्वच्छ व अल्हाददायक पर्यावरण असते. त्याचा फायदा जैवविविधता अंतर्गत ही पाच गावे घेत आहेत. विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातर्फे तसेच पर्यावरण तज्ज्ञ डॉ.गजानन डांगे यांच्यातर्फे नियमित मार्गदर्शन केले जात असते. परिसरातील इतर गावांनीही त्यांचा कित्ता गिरविण्याचे सुरू केले आहे. त्याचा चांगला परिणामी दिसून येत आहे. या भागात वन्यप्राण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे. विविध प्रकारच वन्यप्राणी व पक्षी या भागात आढळून येतात. नैसर्गिक व शुद्ध आहार या भागात असल्याने वनभाजी महोत्सवाला येथे मोठा प्रतिसाद मिळून राज्यातील विविध भागातून लोकं येथे येतात.
जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. रोजगार निर्मिती, नैसर्गिक संसाधने यांच्या विविधतेचा अभ्यासाचे महत्व, व्यवस्थापन करायचे आहे. त्यालाच अनुरूप व्यवस्थापन असेही म्हटले जाते. आपला परिसर समृद्ध करून विविधता टिकवून ठेवावी लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता समित्या स्थापन झाल्या पाहिजे.
-डॉ.गजानन डांगे,
अध्यक्ष, योजक.
गेल्या २० ते २१ वर्षांपासून आम्ही या भागात वन व पर्यावरण संवर्धन केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. वनउपजसह वन्यप्राणी आणि पशुपक्ष्यांच्या अधिवासासाठी हा भाग सर्वोत्कृष्ट आहे. जैव विविधतता जपून ठेवली जात आहे.
-रामसिंग वळवी,
जैव विविधता उपक्रमाचे प्रमुख, कंजाळा.