रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्रातील पोल्ट्रीहबमुळे ओळखल्या जाणाऱ्या नवापुरात सध्या ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट असून, त्यामुळे येथील रोजची एक कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर हजारावर कामगारांचे हात रिकामे झाले आहेत. दरम्यान, अंग भाजणाऱ्या तापमानात पीपीई कीट घालून ‘कलींग ऑपरेशन’ राबविणाऱ्या पशुसंवर्धंन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अक्षरश: लाहीलाही झाली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प होत असून, गेल्या २० वर्षांत ११ पोल्ट्रीफार्म बंदही झाले आहेत.
रोज जवळपास १२ ते १४ लाख अंड्यांचा पुरवठा
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेले नवापूर हे पोल्ट्रीहब म्हणून परिचित आहे. केवळ १० किलाेमीटर अंतराच्या परिसरात येथे ३८ पोल्ट्री फार्म असून, जवळपास १२ लाखांपेक्षा अधिक पक्षी आहेत.
याशिवाय गुजरातची सीमा जवळच असल्याने नवापूरच्या उद्याेजकांनी गुजरातमध्येही भव्य पोल्ट्री फार्म सुरू केले आहेत. या भागातून रोज जवळपास १२ ते १४ लाख अंडी महाराष्ट्र व गुजरातमधील विविध भागात पाठविली जातात.
‘कलिंग ऑपरेशन’ सुरू
सध्या बर्ड फ्ल्यूची बाधा या भागात आली असून, बाधित परिसरातील पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मारण्याची अर्थात ‘कलींग ऑपरेशन’ सुरू असून, गेल्या चार दिवसात सुमारे अडीच लाख पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे.
भारत सरकारने लस उपलब्ध कराव्यात
वारंवार येणाऱ्या संकटामुळे पाेल्ट्री व्यवसाय डबघाईला येत असून, व्यावसायिकांचे हाल होत आहेत. शासनाची मदतही नुकसानीच्या तुलनेत कमी असते. आपल्याकडे ‘H5N1’ हा व्हायरस आहे.
मात्र भारताकडे H9N2 ची लस उपलब्ध आहे. H5N1’ च्या लसीला भारतात बंदी आहे. त्याला भारत सरकारने मंजुरी देवून ती लस उपलब्ध झाल्यास बर्ड फ्ल्यूचा धोका टळू शकतो, असे पाेल्ट्री असोसिएशन अध्यक्ष आरीफ बलेसरिया यांनी सांगितले.
Web Summary : Navapur's poultry industry, a hub in Maharashtra, faces crisis due to bird flu. Daily turnover of millions is stopped, leaving thousands jobless. Culling operations are underway amid rising concerns about economic fallout and the need for effective vaccines.
Web Summary : महाराष्ट्र के नवापुर में बर्ड फ्लू के कारण पोल्ट्री उद्योग संकट में है। दैनिक कारोबार ठप होने से हजारों कर्मचारी बेरोजगार हो गए हैं। आर्थिक नुकसान और प्रभावी टीकों की आवश्यकता के बीच कलिंग ऑपरेशन जारी है।