प्रकाशा येथील मंदिरे व धार्मिक स्थळे आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:08 PM2020-03-22T13:08:05+5:302020-03-22T13:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे आठ दिवस बंद ठेवण्याची सूचना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे आठ दिवस बंद ठेवण्याची सूचना शनिवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या. २२ मार्चचा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन करून आठ दिवस गावात मांस विक्री, भेळपुरी, पानटपऱ्या बंद ठेवण्याचे बैठकीत सांगण्यात आले.
कोरोनाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी येथील ग्रामसचिवालयात शनिवारी सकाळी सरपंच सुदाम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीला जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील, जमादार सुनील पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे, प्रशांत बावस्कर, संजय चौधरी, माजी सरपंच भावडू ठाकरे, मोतीराम बर्डे, नंदकिशोर पटेल, ग्रा.पं. सदस्य महेंद्र भोई, रफीक खाटीक, दिलीप चौधरी, जयगणेश पाटील, व्यापारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. बैठकीत रविवारचा जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील दवाखाने व मेडिकल दुकाने उघडे राहतील. इतर सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.अहिरे यांनी कोरोना विषाणूपासून संसर्ग कसा होतो, बचाव कसा करावा, कोणती दक्षता घ्यावी, ही साखळी तोडण्यासाठी रविवारचा जनता कर्फ्यू किती महत्त्वाचा आहे याची माहिती दिली.
रामचंद्र पाटील यांनी बसस्थानक परिसरातील हॉटेल, पाणीपुरी, भेळपुरी व इतर दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद करण्यासंदर्भात चर्चा करून तशा सूचना दिल्या. हरी पाटील यांनी गावातील इतर दुकाने, उघड्यावरील मांस विक्री बंद करावी, असे सांगितले. नंदकिशोर पटेल यांनी सर्व धार्मिकस्थळे आठ दिवसांसाठी बंद ठेवून मंदिरातील पूजाविधी बंद करावी, असे सूचविले. जमादार सुनील पाडवी यांनी जो व्यक्ती ग्रामपंचायतीचे आदेश मानणार नाहीत. तसेच उघड्यावर मांस विक्री करेल, आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ग्रामविकास अधिकारी बी.जी.पाटील यांनी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, मांस विक्रीची दुकाने बंद करण्यासंदर्भात परिपत्रक काढून सार्वजनिक ठिकाणी सूचनाफलक लिहून, गावात दवंडी देऊन, रिक्षा फिरवून सर्व ग्रामस्थांनी कर्फ्यूत सहभागी व्हावे, असे सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २२ मार्च रोजी देशभरातील जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रकाशा येथे शनिवारी झालेल्या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी जनता कर्फ्यूत का सहभागी व्हावे, त्याचे फायदे काय याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.