बांधावर लावण्यात येणाऱ्या आगीत वृक्षांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:50+5:302021-05-06T04:32:50+5:30
शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्त्याचा दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येते. यातील बहुतांश वृक्षांचे चांगल्या पद्धतीने ...
शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्त्याचा दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येते. यातील बहुतांश वृक्षांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन करण्यात आले आहे. परंतु रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावर वाढलेली काटेरी झुडपे तोडून त्यांना शेतकऱ्यांकडून आग लावण्यात येते. याची झळ रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या वृक्षांनादेखील बसत आहे. बांधावरील लावलेल्या आगीमुळे अनेक वृक्ष जळून खाक झाले आहेत. या वृक्षांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्षारोपण करण्यास सामाजिक वनीकरण विभागाने भाग पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकरी किंवा शेतात काम करणाऱ्या मजुरांकडून बांध स्वच्छतेसाठी आगी लावल्या जातात. आग लावल्यानंतर याकडे कोणीही लक्ष देत नाही. हवा सुरू असल्याने लावलेली आग पुढे पुढे वाढत जाते. यामुळे काटेरी झुडपांसोबत रस्त्याच्या बाजूला लावलेले वृक्षदेखील जळतात. बांधावरील काटेरी झुडपे, गवत याची सफाई करताना आग लावण्यापेक्षा झुडपे तोडून टाकण्याची अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.