नंदुरबार : जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता यंदा बंद करण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात या विद्यार्थिनींना थोडाफार आधार मिळू शकला असता तो देखील हिरावला गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना दरवर्षी उपस्थिती भत्ता दिला जात असतो. दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला २२० रुपये भत्ता दिला जात होता. यावर्षी मात्र कोरोनाचे कारण सांगून हा भत्ता बंद करण्यात आल्याच्या सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना मिळणारा थोडाफार आर्थिक आधार देखील बंद झाला आहे. कोरोनाच्या काळात तरी बंद केला गेला नव्हता पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींना बसणार आहे. दरवर्षी साधारणत: ३६ ते ४० हजार विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत असतात. सर्वच अर्थात ८० टक्के विद्यार्थिनी या साधारण कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना या भत्त्याचा बऱ्यापैकी लाभ होत असतो. या निर्णयामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
दिवसाला एक रुपया तोही केला बंद...
n महागाईच्या जमान्यातही जुन्याच निर्णयाप्रमाणे एक रुपया भत्ता दिला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे शासन अशा विद्यार्थिनींची थट्टाच करीत आहे.
n दिवसाला एक रुपया आणि वर्षाला केवळ २२० रुपये यात विद्यार्थ्यांचे कोणते शालेय साहित्य खरेदी होईल याबाबत आश्चर्य व्यक्त होते. असे असले तरी विद्यार्थिनीच्या कुटुंबाला तो एक आधार समजला जात होता.
कोरोना काळात विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद करणे योग्य नाही. मुळात अशा महागाईच्या काळात एक रुपया भत्ता देणे म्हणजे मजाक करणे होय. त्यामुळे किमान पाच रुपये दिवसाला करावा, अशी मागणी आहे. भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे याबाबत मागणी लावून धरणार आहोत. शिवाय शिक्षक परिषदेनेही आवाज उठविला आहे.
-पुरुषोत्तम काळे, प्रदेश मुख्य संघटक,भटके विमुक्त हक्क परिषद.