विदर्भातही १५ जूनपासून शाळा सुरु ! उन्हात जावे लागेल शाळेत, पालक-शिक्षकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:30 IST2026-03-31T15:29:14+5:302026-03-31T15:30:35+5:30
Nagpur : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये संपूर्ण राज्यासोबतच विदर्भातील प्राथमिक शाळासुद्धा १५ जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Schools to start in Vidarbha from June 15! Will have to go to school in the heat, anger among parents and teachers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये संपूर्ण राज्यासोबतच विदर्भातील प्राथमिक शाळासुद्धा १५ जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भातील पालक व शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे दिसून येते. सरकारला विदर्भाच्या तापमानाचा विसर पडला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जून महिन्यातील तापमान लक्षात घेता विदर्भातील प्राथमिक शाळा पूर्वापार २६ जून किंवा एक जुलैदरम्यान सुरू होतात. अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा खंडित करून २००६-२७ मध्ये जूनच्या दुसऱ्या सोमवारला व त्यानंतर १५ जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयाविरोधात शिक्षकांनी मोठे आंदोलनही उभारले होते. काही शिक्षक संघटना व सामाजिक संस्थांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाचा तो निर्णय रद्द ठरवत विदर्भातील शाळा एक जुलैच्या दरम्यान सुरू व्हायला हव्यात, असा निर्णय ८ जून २००७ रोजी दिला होता. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात यावर अपील दाखल केली होती. मात्र, तीसुद्धा फेटाळण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत दरवर्षी २६ जूनला शाळा सुरू करण्याबाबत २२ जून २००७ रोजी शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तेव्हापासून विदर्भातील शाळा दरवर्षी २६ जूनला सुरू होत होत्या; परंतु अलीकडे शासन या निर्णयाला छेद देत शिक्षण संचालनालय दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना शाळा सुरू करत आहे. संपूर्ण राज्यात १५ जूनला शाळा सुरू करण्याबाबतची ही शासनाची पूर्वतयारी होती असे या निर्णयावरून दिसून येते, असाही आरोप होत आहे.
सरकारला विदर्भाच्या तापमानाचा विसर
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रभरात तापमानाचे आकडे वाढतच चालले आहेत. यंदा पुण्या-मुंबईच्या लोकांनाही याची अभुभूती येत आहे. विदर्भात मात्र सूर्य आग ओकत असल्याची स्थिती असते. मार्च ते जून महिन्यापर्यंत स्थिती तापदायक असते. जून महिन्यात प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो. मे महिन्याप्रमाणे जून महिन्यातही पारा ४५ अंशांच्या जवळपास असतो. त्यामुळे या काळात मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे असते. सरकारला मात्र या स्थितीचा विसर पडला असल्याची टीका महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांनी केला.