४० कोटींची जमीन लाटली साडेतीन कोटींत ! ५०० चा करार बेतला २.१६ कोटींच्या दंडात
By जितेंद्र ढवळे | Updated: May 18, 2026 18:20 IST2026-05-18T18:18:56+5:302026-05-18T18:20:25+5:30
बेसातील जमीन व्यवहारात २.४५ कोटींची मुद्रांक शुल्क चोरी? : रोहन ठाकर यांना ४.६२ कोटी भरण्याची नोटीस

Land worth 40 crores sold for 3.5 crores! Contract worth 500 was cancelled with a fine of 2.16 crores
जितेंद्र ढवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारात मुद्रांक शुल्क चुकविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मौजा बेसा येथील तब्बल ४० कोटींहून अधिक बाजारमूल्य असलेल्या जमिनीचा साडेतीन कोटी रुपयांत व्यवहार करून केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी नागपूर शहराचे सह-जिल्हानिबंधक वर्ग-१ तथा मुर्दाक जिल्हाधिकारी तानाजी ल. गंगावणे यांनी खरेदीदार रोहन धनरंजन ठाकर, रा. शिवाजीनगर, कोतवाली यांना नोटीस बजावत कमी पडलेले मुद्रांक शुल्क आणि दंडासह एकूण ४ कोटी ६२ लाख १३ हजार २२० रुपये सरकारी खजिन्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
काय आहे हे नेमके प्रकरण ते समजून घ्या!
- रोहन धनरंजन ठाकर यांनी मौजा बेसा येथील खसरा क्रमांक ९३/४ व २३/५ मधील एकूण १.६० आणि १.२१ हेक्टर आर क्षेत्रफळाच्या जागेचा विक्री करारनामा ३ ऑक्टोबर २०२२ रोजी निष्पादित केला होता. हा भूखंड खैरून्निसा मो. समद मो. ईसाक यांनी रोहन ठाकर यांना ३ कोटी ५० लाख रुपयांत विकला होता. मात्र, एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांक पेपरचा वापर करण्यात आल्याने शासनाचा मोठा महसूल बुडाल्याची बाब समोर आली.
- या प्रकरणी उदयसिंग यादव यांनी ११ मे २०२६ रोजी नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक, नागपूर विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२२-२३ च्या रेडी रेकनरनुसार संबंधित स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन केले. त्यानुसार या जमिनीचे शासकीय बाजारमूल्य तब्बल ४० कोटी ९६ लाख ९८ हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले.
- महाराष्ट्र मुद्रांक 3 अधिनियमातील तरतुदीनुसार या व्यवहारावर ५ टक्के मुद्रांक शुल्क आणि १ टक्का जिल्हा परिषद, पंचायत समिती कर असे एकूण ६ टक्के दराने २ कोटी ४५ लाख ८१ हजार ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५०० रुपये भरल्याने तब्बल २ कोटी ४५ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा महसूल शासनाला गमवावा लागल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
कलम ३९ अंतर्गत दंड
व्यवहाराला दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटल्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ च्या कलम ३९ अंतर्गत प्रतिमहा २ टक्के दराने ४४ महिन्यांसाठी २ कोटी १६ लाख ३१ हजार ७२० रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
"मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. मी केवळ ५०० रुपच्या स्टॅम्प पेपरवर सौदा केला होता. उलट या प्रकरणात मीच पोलिसात तक्रार केली आहे. खैरून्निसा मो. समद मो. ईसाक यांच्या नावावर जमिनीचा सातबाराच नाही तर या प्रकरणात खरेदी व्यवहार कसा होईल? मला या प्रकरणात गोवण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे. नोटिशीची प्रत माझ्याआधी तक्रारकर्त्याला कशी मिळाली. त्यांचे या प्रकरणात काही हितसंबंध तर नाही ना?"
- रोहन ठाकर, नागपूर.